

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर आता सर्वांचे लक्ष आयपीएल २०२६ कडे लागले आहे. मात्र, या स्पर्धेपूर्वीच भारतीय संघाची धडाकेबाज सलामी जोडी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा एका विशेष कार्यक्रमात एकत्र आले. यावेळी संजूने त्यांच्यातील मैदानातील ताळमेळ आणि वैयक्तिक मैत्रीवर भाष्य करताना, "आमची जोडी म्हणजे 'आइस अँड फायर' नसून 'फायर अँड फायर' आहे," असे ठामपणे सांगितले.
टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीने केलेल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले. या विजयात दोघांच्या खेळीचा मोलाचा वाटा होता. आयपीएलच्या रणधुमाळीपूर्वी 'इंडिया टुडे'च्या एका कार्यक्रमात बोलताना संजूने अभिषेकसोबतच्या आपल्या केमिस्ट्रीचा खुलासा केला.
संजू सॅमसन म्हणाला, "लोकांना वाटते की आमच्यापैकी एक शांत आणि दुसरा आक्रमक आहे, पण वास्तव तसे नाही. आम्ही दोघेही मैदानात आगीसारखे धगधगत असतो. कधी तो धावांचा पाऊस पाडतो, तर कधी मी. आमचा ताळमेळ अत्यंत नैसर्गिक आहे. २०२४ पासून आम्ही एकत्र खेळत आहोत आणि खेळपट्टीवरील आमची ही भागीदारी म्हणजे केरळ आणि पंजाब या दोन राज्यांच्या मैत्रीचे प्रतीक आहे."
वयाचा विचार करता संजू सॅमसन हा अभिषेकपेक्षा सहा वर्षांनी वरिष्ठ आहे. संजूने ऑक्टोबर २०११ मध्ये केरळसाठी व्यावसायिक क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात केली, तर अभिषेकने फेब्रुवारी २०१७ मध्ये पंजाबकडून पदार्पण केले. विशेष म्हणजे, २०२४ च्या उत्तरार्धात भारतीय संघासाठी सलामीला येण्यापूर्वी या जोडीने कोणत्याही स्तरावर एकत्र डावाची सुरुवात केली नव्हती.
संजूने अभिषेकच्या स्वभावाचे कौतुक करताना सांगितले की, "मैदानात एकमेकांशी संवाद साधणे आमच्यासाठी खूप सोपे असते. अभिषेक अत्यंत धाडसी आणि शांत प्रवृत्तीचा खेळाडू आहे. अनेकदा जेव्हा तो मला चेंडूच्या हालचालीबद्दल विचारतो, तेव्हा मी त्याला अतिशय साध्या भाषेत सांगतो की, 'चेंडू व्यवस्थित येत आहे, तू फक्त षटकार ठोक!' त्याचे व्यक्तिमत्व मला खूप आवडते आणि मैदानाबाहेरही आमची मैत्री तितकीच घट्ट आहे."