

Mohammed Shami Ranji Trophy: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या अनेक महिन्यापासून भारतीय संघाचे दार ठोठावत आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत असून त्यानं आपला मॅच फिटनेस देखील सिद्ध करून दाखवला आहे. तरी देखील मोहम्मद शमीवर निवडसमितीची कृपादृष्टी होताना दिसत नाहीये.
असाच काहीसा प्रकार हा इशान किशनच्या बाबतीत देखील झाला होता. मात्र ऐन टी २० वर्ल्डकपच्या तोंडावर इशान किशनला संधी मिळाली अन् त्यानं संधीचं सोनं देखील करून दाखवलं. इशानप्रमाणेच मोहम्मद शमी देखील देशांतर्गत क्रिकेटमध्ये फक्त दर्जेदार कामगिरी करत नाहीये तर त्याच्यात त्यानं सातत्य देखील दाखवलं आहे. नुकतेच त्यानं रणजी ट्रॉफीच्या सेमी फायनल सामन्यात जम्मू काश्मीरविरूद्ध ९० धावात ८ विकेट्स घेतल्या.
या कामगिरीद्वारे मोहम्मद शमीने आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज असल्यांच देखील सांगितलं. त्याने नवीन चेंडूवर दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्यानं १४३ धावांची भागीदारी देखील तोडली अन् सामन्याचं चित्र बदललं. त्याच्या या स्पेलमधून अनुभव, फिटनेस आणि आक्रमक मानसिकता याचं दर्शन झालं.
यंदाच्या रणजी हंगामात मोहम्मद शमीने ३६ विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपला १५ वा फाईव्ह फॉर साजरा केला. यापूर्वी २०१२ -१३ शमीने ७९ धावात ७ विकेट्स घेतल्या होत्या ती त्यांची सर्वोत्त कामगिरी होती. आता त्यानं ९० धावात ८ विकेट्स घेत ही कामगिरी देखील मागे टाकली.
गेल्या सामन्यात मोहम्मद शमीने अर्धशतक झळकावत फलंदाजीत देखील चुणूक दाखवून दिली. आता इतकी चांगली कामगिरी करून देखील मोहम्मद शमीवर निवडसमिती प्रसन्न का होत नाहीये.
निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर आणि निवडसमिती सदस्यांकडून मोहम्मद शमीच्या भविष्याबाबत स्पष्टता येत नाही. शमीने सार्वजनिकरित्या आपल्या संघातील भूमिका आणि भविष्याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत मिळत नाहीये असं सांगितलं होतं.
निवडसमितीने मोहम्मद शमीला संघात न घेतल्यानं ही नाराजी नाही तर भूमिका स्पष्ट न करण्याबाबत आहे. जर भारतीय वेगवान गोलंदाजी आता संक्रमणाच्या काळातून जात असेल तर रणजी ट्रॉफीमध्ये ३६ विकेट्स घेणारा मोहम्मद शमी या प्रक्रियेतून बाहेर गेला आहे का? जर त्याच्यासाठी मोठी योजना तयार केली जात आहे तर त्याची सध्याची कामगिरी दखल घेण्याजोगी नाहीये का?
ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात भारताचा न्यूझीलंड दौरा होणार आहे. या दौऱ्यावर दोन कसोटी सामने होणार आहेत. २००९ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडमध्ये शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. तेव्हापासून आतापर्यंत भारताला तिथं कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.
२०१४ मध्ये शमीने न्यूझीलंडमधील दोन कसोटी मालिकेत १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यानं वेलिंग्टन कसोटीत ४ तर ऑकलँड कसोटीत ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर २०२० मध्ये त्याने दोन कसोटीत ५ विकेट्स घेतल्या. ख्राईस्टचर्चमध्ये ८१ धावात ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. न्यूझीलंडमध्ये ५ कसोटीत त्याच्या नावावर १५ विकेट्स आहेत.
न्यूझीलंडमधील खेळपट्ट्या या सीम आणि स्विंगसाठी पोषक असतात. या दोन्ही गोष्टी शमीची बलस्थानं आहेत. त्यामुळं निवडसमिती आता तरी शमीकडे लक्ष देणार का याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. जर संघ व्यवस्थापन भविष्याकडं पाहत असेल तर मोहम्मद शमीचा चाप्टर निवडसमितीसाठी बंद झाला असू शकतो. अशा परिस्थितीत मोहम्मद शमीला निदान फेअरवेल देण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर निवडलं जाण्याची शक्यता देखील आहे. मोहम्मद शमीने भारताकडून २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शेवटचा सामना खेळला होता.