

Mohammad Kaif Slams Team India: कोलकाता टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून 30 धावांनी झालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर चौफेर टीकेचा भडिमार सुरू आहे. फिरकीला भरपूर मदत मिळणाऱ्या पिचवर भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी केल्यानंतर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी थेट टीम व्यवस्थापनावरच निशाणा साधला आहे. त्यांच्या मते, भारतीय संघात सध्या “भीतीचं वातावरण” निर्माण झालं असून, खेळाडू मनमोकळेपणाने खेळूच शकत नाहीत.
आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना कैफ म्हणाले, “आज भारतीय संघात सर्वांत मोठी कमतरता म्हणजे विश्वासाचा अभाव. खेळाडूंच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत नाही. प्रत्येक जण जणू काही चुकलो तर बाहेर बसवतील या भीतीत खेळतोय. टीम मॅनेजमेंट त्यांच्या बाजूने उभं आहे, अशी भावना कोणालाही वाटत नाही.”
कैफ यांनी सरफराज खान आणि साई सुदर्शन या दोन खेळाडूंचं उदाहरण देत सिलेक्शन पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला. सरफराजने शतक ठोकल्यानंतरही त्याला पुढच्या सामन्यात स्थान देण्यात आलं नाही. तर सुदर्शनने मागील टेस्टमध्ये 87 धावा केल्यावरही त्याला बाहेर बसवण्यात आलं.
कैफ म्हणाले, “जेव्हा 100 धावा करूनही खेळाडूला संघात जागा मिळत नसेल, तेव्हा इतरांचं मनोबल कसं वाढणार? यामुळे संघात अनिश्चितता वाढते. खेळाडू चांगला खेळ सोडून फक्त जागा टिकवण्यासाठी खेळू लागतो.”
भारतीय फलंदाजी फिरकीसमोर पुन्हा एकदा अपयशी ठरल्याची कबुली देताना कैफ म्हणाले, “वॉशिंगटन सुंदर यानं चांगली लढत दिली कारण तो चेन्नईच्या टर्निंग पिचवर खेळत आलाय. त्याला चेंडू कधी खेळायचा, पाय कधी पुढे न्यायचा, हात कधी सैल ठेवायचे हे सगळं माहित आहे.”
त्यांच्या मते सुदर्शनही चेन्नईचाच असल्याने अशा पिचवर तो टीमसाठी खूप उपयुक्त ठरू शकला असता. “सुदर्शन फॉर्ममध्ये होता, 87 धावा केल्या होत्या. तरीही त्याला प्लेइंग-इलेव्हनमध्ये स्थान नाही.” अशी टीका त्यांनी केली.
कैफ यांच्या मते, टीम मॅनेजमेंट सातत्याने खेळाडू बदलत असल्याने संघातील स्थैर्य पूर्णपणे बिघडलं आहे. खेळाडूंना स्वतःच्या स्थानाबाबत खात्री नसल्याने ते स्वाभाविक खेळ खेळत नाहीत. त्यांना आत्मविश्वासाने नव्हे, तर भीतीने खेळावे लागते.
“खेळाडूची सर्वोत्तम कामगिरी तेव्हाच दिसते, जेव्हा त्याला माहिती असतं की चूक झाली तरी मला संधी मिळेल. आज त्या सुरक्षिततेचा पूर्ण अभाव आहे,” असे कैफ म्हणाले.
कसोटी क्रिकेटचा दुसरा सामना शुक्रवारी होत आहे. पहिल्या टेस्टमधील चुका दुरुस्त केल्याशिवाय भारताला सीरिज टिकवणे कठीण जाईल, असा कैफ यांचा इशारा आहे.
चांगला संघ आणि खेळाडूंवर विश्वास, या गोष्टी भारतासाठी अत्यावश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कैफ यांच्या वक्तव्यांनंतर भारतीय संघातील वातावरण, सिलेक्शनची पद्धत आणि टीम मॅनेजमेंटची स्ट्रॅटेजी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.