

A historic day in IPL 2026 as 986 runs were scored in two matches
नवी दिल्ली : IPL 2026 च्या हंगामात एका ऐतिहासिक दिवसाची नोंद झाली आहे. शनिवारी (दि.25) खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांमध्ये मिळून एकूण ९८६ धावा झाल्या. यामध्ये दोन वेळा २६० पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्यात आला. या थरारक शनिवारी 'ऑरेंज कॅप'ने तब्बल चार वेळा आपले मानकरी बदलले, यावरूनच सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमधील चुरस दिसून आली.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर के.एल. राहुलने ६७ चेंडूत १५२ धावांची नाबाद खेळी करत इतिहास रचला. आयपीएलच्या एका डावात १५० धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने ऋषभ पंतचा फ्रँचायझी विक्रमही मोडला. दिल्ली कॅपिटल्ससाठी (DC) सलामीला येत राहुल आणि नितीश राणा यांनी २२० धावांची भागीदारी केली आणि दिल्लीला २ बाद २६४ धावांपर्यंत मजल मारून दिली.
राहुलच्या या खेळीत १६ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता, तर त्याचा स्ट्राईक रेट २२६ पेक्षा जास्त होता. त्याने केवळ ४७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. दिल्ली कॅपिटल्ससाठी हे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. या कामगिरीसह राहुलने आयपीएलमध्ये एकूण ५,५७९ धावा पूर्ण करत एमएस धोनीला मागे टाकले असून तो सर्वाधिक धावांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच नितीश राणानेही ४४ चेंडूत ९१ धावांचे योगदान दिले. यादरम्यान त्याने आयपीएलमधील आपल्या ३,००० धावा पूर्ण केल्या.
धुवांधार फलंदाजी करूनही दिल्लीचा हा धावसंख्या डोंगर पंजाब किंग्सला रोखू शकला नाही. लुंगी एनगिडीला दुखापत झाल्यामुळे गोलंदाजीत फटका बसलेल्या पंजाबने २६५ धावांचे लक्ष्य ७ चेंडू राखून पूर्ण केले. टी-२० इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला आहे. श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत नाबाद ७१ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. पंजाबने दोन वर्षांपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध केलेल्या २६२ धावांच्या पाठलागाचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला.
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सच्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३६ चेंडूत शतक झळकावत खळबळ उडवून दिली. टी-२० मध्ये १,००० धावा पूर्ण करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. वैभवच्या १२ षटकारांच्या जोरावर राजस्थानने २२८ धावा केल्या. मात्र, सनरायझर्स हैदराबादने (SRH) हे लक्ष्य ९ चेंडू राखून गाठले. इशान किशन (७४) आणि अभिषेक शर्मा (५७) यांच्या फटकेबाजीमुळे जयपूरच्या मैदानावरील हा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला.
दिवसभरात ऑरेंज कॅप विराट कोहलीकडून के.एल. राहुलकडे, त्यानंतर वैभव सूर्यवंशीकडे आणि दिवसाच्या शेवटी अभिषेक शर्माकडे गेली. या धावसंख्येच्या महापुरावर बोलताना हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला, "२०२६ मध्ये टी-२० गोलंदाज म्हणून टिकून राहायचे असेल, तर तुम्हाला स्वतःच्या फलंदाजीवर काम करावे लागेल."