

India vs Pakistan T20 World Cup 2026: 15 फेब्रुवारीला होणाऱ्या भारत–पाकिस्तान सामन्यामुळे वातावरण तापलं आहे. कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे रंगणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या लढतीसाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि याचा थेट परिणाम जाहिरात मार्केट, फ्लाइट बुकिंग आणि हॉटेल दरांवर दिसून येतोय.
या हाय-व्होल्टेज सामन्याआधी जाहिरात क्षेत्रात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. इंडस्ट्री एक्सपर्ट्सनुसार, या सामन्यासाठी 10 सेकंदाच्या टीव्ही अॅड स्लॉटचा रेट तब्बल 30 ते 40 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. साधारण वर्ल्ड कप सामन्यांत हा दर 20–25 लाखांच्या आसपास असतो. शेवटच्या क्षणी घेतल्या जाणाऱ्या स्लॉट्समध्ये 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, सामन्यादरम्यान जवळपास प्रत्येक सेकंद विकला जाणार असल्याचं चित्र आहे. ब्रॉडकास्टर JioStar ला पूर्ण स्पर्धेतून सुमारे 2,000 कोटी रुपयांपर्यंत जाहिरात महसूल मिळेल, असा अंदाज वर्तवला जातोय.
डिजिटल प्लॅटफॉर्म JioHotstar वरही अॅड रेट्स गगनाला भिडले आहेत. येथे 10 सेकंदांचा स्लॉट 15–20 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ऑटोमोबाईल, एफएमसीजी, फायनान्स, इन्शुरन्स आणि रिअल इस्टेट कंपन्या मोठ्या प्रमाणात अॅड स्पेस खरेदी करत आहेत. या टी20 वर्ल्ड कपमध्ये जाहिरात देणाऱ्या ब्रँड्समध्ये Emirates, Amul, OpenAI, Hyundai, Mahindra & Mahindra आणि Britannia यांचा समावेश आहे. मार्केटिंग तज्ज्ञ तर भारत–पाकिस्तान सामन्याच्या अॅड रेट्सची तुलना थेट सोन्या–चांदीच्या किमतींशी करत आहेत.
मैदानाबाहेरही चाहत्यांची गर्दी वाढत आहे. भारतातून कोलंबोकडे जाणाऱ्या क्रिकेटप्रेमींची संख्या झपाट्याने वाढली असून ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म EaseMyTrip नुसार राउंड-ट्रिप विमानभाडं सामान्य दिवसांच्या तुलनेत 45 ते 50 टक्क्यांनी महाग झालं आहे. MakeMyTrip च्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारीच्या वीकेंडसाठी कोलंबोच्या बुकिंग्स गेल्या तीन दिवसांत दुप्पट झाल्या आहेत. तर Cleartrip सांगते की भारत–पाकिस्तान सामन्यामुळे कोलंबोसाठीच्या बुकिंगमध्ये जवळपास 65 टक्क्यांची वाढ झाली आहे.
याचाच परिणाम हॉटेल दरांवरही दिसतोय. कोलंबोमधील पंचतारांकित हॉटेल्सना सर्वाधिक मागणी असून, प्रीमियम रूम्सचे दर सामान्य सीझनपेक्षा 20–25 टक्क्यांनी वाढले आहेत. हॉटेल इंडस्ट्रीच्या मते, सामना सुरू असलेल्या कालावधीत शहरातील बहुतांश प्रमुख प्रॉपर्टीज जवळपास ‘फुल’ होण्याच्या मार्गावर आहेत. एकूणच, भारत–पाकिस्तान सामना हा आता केवळ क्रिकेटपुरता मर्यादित राहिलेला नाही. जाहिरातींपासून पर्यटनापर्यंत, प्रत्येक क्षेत्रात या सामन्याचे आर्थिक परिणाम दिसत आहेत.