

India’s Semi-Final Scenario Explained: टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात मजबूत संघ मानला जात असलेला भारत अचानक अडचणीत सापडला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला सुपर-8 फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून तब्बल 76 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात एवढ्या मोठ्या धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा पराभव झाला आहे. या धक्कादायक निकालाने भारताची विजयी मालिका खंडित झालीच, पण उपांत्य फेरीचा मार्गही कठीण झाला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही निराशाजनक झाली. गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली झुंज देत दक्षिण आफ्रिकेला 187 धावांवर रोखले होते. हा पाठलाग भारतासाठी अवघड नव्हता. मात्र या स्पर्धेत सुरुवातीपासूनच लय सापडत नसलेली भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा कोसळली आणि संघ केवळ 111 धावांवर गारद झाला. परिणामी, दक्षिण आफ्रिकेने दणदणीत विजय मिळवला.
या पराभवानंतर भारत आता ‘करो या मरो’ स्थितीत पोहोचला आहे. सुपर-8 फेरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे आहेत. भारताने पहिलाच सामना गमावला असल्याने आता पुढील दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य झाले आहे. भारताचा पुढील सामना 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध, तर 1 मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. हे दोन्ही सामने जिंकले, तर भारताच्या खात्यात चार गुण जमा होतील.
मात्र केवळ दोन विजय मिळवणे पुरेसे ठरणार नाही. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यापैकी किमान दोन संघांनी आपले दोन सामने गमावणे भारतासाठी आवश्यक आहे. अशा परिस्थितीत भारत आणि आणखी एक संघ चार किंवा सहा गुणांसह पुढे जाऊ शकतील.
जर या गटात तीन संघ चार-चार गुणांवर समान स्थितीत राहिले, तर निर्णय नेट रनरेटवर होईल. आणि इथेच भारताची अडचण आहे. 76 धावांच्या मोठ्या पराभवानंतर भारताचा नेट रनरेट -3.800 इतका घसरला आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा +3.800 आहे. इतक्या मोठ्या फरकामुळे भारतासाठी पुढील सामन्यांत मोठ्या अंतराने विजय मिळवणे आवश्यक झाले आहे.
आयसीसीच्या नियमानुसार, गुण समान असतील तर प्रथम विजयांची संख्या पाहिली जाते. तीही समान असल्यास नेट रनरेट निर्णायक ठरतो. त्यामुळे भारताने उर्वरित दोन्ही सामन्यांत केवळ विजयच नाही, तर शक्य तितक्या मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे. अन्यथा सुपर-8 फेरीतूनच बाहेर पडण्याचा धोका आहे.