

Hardik Pandya Trade: आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या संघ सोडणार का, याबाबत क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. हार्दिक पंड्याला चेन्नई सुपर किंग्स (CSK) आपल्या संघात सामील करण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याशिवाय दिल्ली कॅपिटल्स (DC), कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांनाही हार्दिकमध्ये रस असल्याचे वृत्त समोर आले होते.
या सर्व चर्चांदरम्यान आता मुंबई इंडियन्सने प्रथमच अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. फ्रँचायझीने सध्या कोणत्याही खेळाडूच्या ट्रेडबाबत चर्चा सुरू नसल्याचे सांगितले असले, तरी पुढील काही दिवसांत मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात, असेही संकेत दिले आहेत.
मुंबई इंडियन्सच्या प्रवक्त्याने Sportstarशी बोलताना सांगितले की, संघाचा पोस्ट-सीझन रिव्ह्यू सुरू असून संघाच्या प्रत्येक बाबीचा आढावा घेतला जात आहे. प्रवक्त्याने स्पष्ट केले की, ''सध्या कोणत्याही फ्रँचायझीसोबत खेळाडूंच्या ट्रेडबाबत चर्चा सुरू नाही. संघाचा आढावा पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल."
त्यांनी पुढे सांगितले की, संघ व्यवस्थापन विविध पर्यायांचा विचार करत आहे. मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
काही माध्यमांच्या वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात हार्दिक पंड्याच्या संभाव्य ट्रेडबाबत चर्चा सुरू होती.
या वृत्तांमध्ये मुंबई इंडियन्सला आयुष म्हात्रे आणि शिवम दुबे यांच्यात रस असल्याचे म्हटले होते. तर चेन्नईकडून शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेविस आणि सुमारे 10 कोटी रुपयांचा प्रस्ताव असल्याची चर्चा होती.
याशिवाय दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांनीही हार्दिकला आपल्या संघात घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचे वृत्त होते. मात्र, मुंबई इंडियन्सने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
2024 च्या हंगामापूर्वी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याकडे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही.
2024 मध्ये मुंबई इंडियन्स गुणतालिकेत तळाशी राहिली.
2025 मध्ये संघ प्लेऑफपर्यंत पोहोचला, पण विजेतेपद मिळवू शकला नाही.
मागील हंगामात संघाने केवळ 4 सामने जिंकले, तर 10 पराभवांसह नवव्या स्थानावर घसरण झाली.
या काळात संघातील अंतर्गत मतभेद, वरिष्ठ खेळाडूंचा मर्यादित पाठिंबा आणि सातत्याने होणाऱ्या दुखापती यामुळे हार्दिकच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
मुंबई इंडियन्सने सध्या ट्रेडच्या सर्व चर्चा फेटाळल्या असल्या, तरी पोस्ट-सीझन आढावा पूर्ण झाल्यानंतर संघात मोठे बदल होण्याची शक्यता त्यांनी नाकारलेली नाही.
त्यामुळे हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये कायम राहणार की दुसऱ्या फ्रँचायझीकडे जाणार, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसला, तरी आगामी काळात मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाचे निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.