

India T20 World Cup 2026 win Gautam Gambhir coach reaction
अहमदाबाद: क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही देशाला तीनवेळा टी-२० विश्वचषक जिंकता आलेला नव्हता. ही ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिलाच संघ ठरला आहे. भारतीय संघाला विश्वविजेते बनवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गंभीरने या विजयाचे श्रेय संपूर्ण देशाला दिले आहे. गंभीरने सोशल मीडियावर आपल्या संपूर्ण कुटुंबासोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने ‘सौभाग्यपूर्ण’ असे कॅप्शन दिले आहे. मैदानावर गंभीर चेहऱ्याने वावरणाऱ्या गंभीरचा हा कौटुंबिक आणि आनंदी अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
विजयाचा जल्लोष साजरा करताना गंभीरने पोस्टमध्ये लिहिले की, "ही फक्त देवाची योजना नव्हती, तर १.४ अब्ज भारतीयांची योजना होती. प्रत्येक खेळाडू एक जागतिक विजेता आहे."
प्रशिक्षक म्हणून गंभीरवर सुरुवातीला अनेक स्तरातून टीका झाली होती. विशेषतः कसोटी क्रिकेटमधील कामगिरीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने अवघ्या ६ महिन्यांत दुसरे मोठे जेतेपद पटकावून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. यापूर्वी भारताने गंभीरच्या मार्गदर्शनाखाली आशिया चषकावर नाव कोरले होते. सध्या वन-डे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघ जगातील सर्वात शक्तिशाली संघ आहे.