

drop rohit sharma and virat kohli from odi team before its too late
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका संपून एक आठवडाही उलटत नाही, तोच भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू, विराट कोहली आणि रोहित शर्मा, पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. अँडरसन-तेंडुलकर चषकाचा २५ वा आणि शेवटचा दिवस गेल्या सोमवारी संपला, परंतु 'रो-को' जोडीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. असे असले तरी त्यामागील कारणे फारशी सकारात्मक नाहीत. भारतीय फलंदाजीच्या या दोन स्टार खेळाडूंच्या भविष्याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. ऑक्टोबरमधील ऑस्ट्रेलिया दौरा त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीचा शेवटचा टप्पा ठरू शकतो, असा अंदाजही वर्तवला जात आहे.
२०२७ च्या विश्वचषकात रोहित आणि कोहली भारताकडून खेळतील, अशी आशा दिवसेंदिवस धूसर होत चालली आहे. या जागतिक स्पर्धेवेळी रोहित ४० वर्षांचा तर कोहली ३९ वर्षांचा असेल. माध्यमांमधून येणाऱ्या परस्परविरोधी वृत्तांमुळे हा संभ्रम अधिकच वाढत आहे.
वृत्तानुसार, जर कोहली आणि रोहितने आगामी विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळण्यास सहमती दर्शवली नाही, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका ही त्यांची भारतीय संघाच्या जर्सीमधील अखेरची मालिका ठरू शकते. दोन्ही दिग्गजांनी कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे ते केवळ आंतरराष्ट्रीत एकदिवसीय आणि आयपीएल यामध्येच खेळताना दिसणार आहेत.
‘पीटीआय’ने एका सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयमध्ये अद्याप अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. सध्या बीसीसीआयचे संपूर्ण लक्ष पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेवर आहे. त्यानंतरच रोहित आणि विराटच्या भवितव्यावर विचार केला जाईल, असे या वृत्तात म्हटले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या चर्चेला अधिक गती दिल्यानंतर, आता आणखी एका माजी निवडकर्त्याने रोहित आणि विराटशिवाय पुढील वाटचालीसाठी सज्ज राहण्याचा सल्ला बीसीसीआयला दिला आहे. बोर्डाचे माजी राष्ट्रीय निवडकर्ते देवांग गांधी यांच्या मते, एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यासाठी युवा खेळाडूंची मोठी रांग लागलेली असताना, रोहित आणि विराट यांना टप्प्याटप्प्याने संघातून बाहेर करणे आवश्यक आहे.
इंग्लंड दौऱ्यातील युवा खेळाडूंची प्रभावी कामगिरी पाहता, भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आता नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देणे आणि प्रतिभासंपन्न खेळाडूंची नवी पिढी घडवणे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे. या प्रक्रियेत भलेही गेल्या दशकातील दोन महान खेळाडूंना निरोप द्यावा लागला तरी चालेल, असा ठाम विश्वास देवांग गांधी यांनी व्यक्त केला.
‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना गांधी म्हणाले, ‘यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, साई सुदर्शन यांच्यासारख्या खेळाडूंनी परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता सिद्ध केली आहे. असे असताना त्यांना संघाबाहेर कसे बसवणार? टी-२० मधून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणे हे मोठे स्थित्यंतर असते. एकदा का खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आणि त्याच्याकडे आक्रमक खेळ करण्याची क्षमता असेल, तर एकदिवसीय क्रिकेट त्याच्यासाठी अधिक सोपे व्हायला हवे. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने एकत्र बसून यावर निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे,’ असे ते म्हणाले.
रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतर इंग्लंड दौ-यातील कसोटी मालिकेत भारतीय संघ अडचणीत येईल, असे चित्र निर्माण झाले होते. पण, युवा खेळाडूंनी जबाबदारी स्वीकारत निकराची झुंज दिली आणि मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. या पार्श्वभूमीवर देवांग गांधी यांचे मत अधिक महत्त्वाचे ठरते. एकदिवसीय क्रिकेटमध्येही प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही, त्यामुळे भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित हातात असल्याचे दिसते. मात्र, या युवा खेळाडूंची योग्य काळजी घेतली नाही, तर संघाचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही धोक्यात येऊ शकते, असा इशाराही गांधी यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले, ‘समजा, वर्षभरात अशी परिस्थिती निर्माण झाली की या दोघांपैकी (रोहित किंवा विराट) एकजण फॉर्ममध्ये नाही आणि आपल्याला बदली खेळाडूची गरज आहे, तर त्यावेळी संघ व्यवस्थापनाकडे नवीन खेळाडूला तयार करण्यासाठी पुरेसा वेळ नसेल. रोहित आणि विराटच्या योगदानाबद्दल कोणतीही शंका नाही. पण, काळ कोणासाठी थांबत नाही.’