

चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील रविवारचा (दि. ५) सामना अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे. मात्र, या हाय-व्होल्टेज सामन्यात सर्वांच्या नजरा प्रामुख्याने संजू सॅमसनवर खिळल्या आहेत.
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आपल्या फलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा पालापाचोळा करणाऱ्या संजूची बॅट आयपीएलच्या चालू हंगामात अद्याप शांत आहे. अशा परिस्थितीत, संजूकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा चेन्नईचे चाहते आतुरतेने करत आहेत.
रविवारी बेंगळुरूविरुद्ध मैदानात उतरताना संजू सॅमसनकडून स्फोटक खेळीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याच सामन्यात त्याला एक ऐतिहासिक टप्पा गाठण्याची सुवर्णसंधी आहे. संजूने २०११ पासून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून आतापर्यंत ३९६ षटकार ठोकले आहेत. टी-२० फॉरमॅटमध्ये ४०० षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला आता केवळ ४ षटकारांची गरज आहे. जर आज त्याने ही किमया साधली, तर ४०० किंवा त्याहून अधिक षटकार मारणाऱ्या निवडक भारतीय फलंदाजांच्या मांदियाळीत त्याचे नाव कोरले जाईल.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम 'हिटमॅन' रोहित शर्माच्या नावावर आहे. त्यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचा क्रमांक लागतो. रोहित शर्मा हा ५०० हून अधिक षटकार ठोकणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे.
रोहित शर्मा : ५५३ षटकार
विराट कोहली : ४४० षटकार
सूर्यकुमार यादव : ४१९ षटकार
संजू सॅमसन : ३९६ षटकार
एम.एस. धोनी : ३५० षटकार