

Yuvraj Singh apology
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटचा 'सिक्सर किंग' म्हणून अशी ओळख असणाऱ्या युवराज सिंगने २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक विजयात मोलाची भूमिका बजावली होती. मात्र, याच काळात एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने यशाची शिखरे गाठली, ज्यामुळे युवराजला दीर्घकाळ संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकली नाही. निवृत्तीनंतर युवराजचे वडील आणि माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी युवराजला कर्णधारपद न मिळण्यामागे एम.एस. धोनीचा हात असल्याचे आरोप वारंवार केले आहेत. मात्र, आता स्वतः युवराजने यावर प्रथमच उघडपणे भाष्य केले आहे.
'स्पोर्ट्स तक' पॉडकास्टमध्ये बोलताना युवराज म्हणाला, "मला कपिल देव आणि एम.एस. धोनी यांची जाहीर माफी मागायची आहे." यावेळी त्याला विचारण्यात आले की, तुझे वडील खेळाडूंबद्दल अशी विधाने करतात, तेव्हा तुला वाईट वाटते का? यावर युवराजने स्पष्ट केले की, "मी वडिलांना स्पष्ट सांगितले आहे की, त्यांचे हे वागणे चुकीचे आहे."
पंजाबमधील प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक असलेले योगराज सिंग हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. २०२५ मध्ये त्यांनी एका मुलाखतीत कपिल देव यांच्याबद्दल अत्यंत धक्कादायक खुलासा केला होता. १९८० च्या दशकात संघातून वगळल्याच्या रागातून त्यांनी कपिल देव यांच्यावर पिस्तूल रोखल्याचे धक्कादायक विधान केले होते. "कपिल देव यांनी विनाकारण मला संघातून काढले होते. त्यामुळे मी रागाच्या भरात त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ केली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती," असे योगराज यांनी म्हटलं होतं.
केवळ कपिल देवच नव्हे, तर एम.एस. धोनी आणि बिशन सिंग बेदी यांच्यावरही योगराज यांनी अनेकदा टीका केली आहे. "ज्यांनी लोकांसोबत चुकीचे वागले, त्यांच्याबद्दल मी बोलणारच. जे चुकीचे आहे ते चुकीचेच आहे," अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली होती. वडिलांच्या या विधानांमुळे अनेकदा युवराजलाही टीकेचे धनी व्हावे लागले आहे.