

Pakistan Boycott India Match T20 WC 2026: गेल्या रविवारी पाकिस्तान सरकारनं क्रिकेट वर्तुळाला एक धक्का दिला. त्यांनी भारतात होणाऱ्या आगामी टी २० वर्ल्डकप स्पर्धेत भारताविरूद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याचा निर्णय घेतला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा १५ फेब्रुवारीला होणार आहे. पाकिस्ताननं हा निर्णय बांगलादेशला पाठिंबा दर्शवण्यासाठी घेतल्याचं सांगण्यात आलं.
बांगलादेशने सुरक्षेचे कारण देत भारतात टी २० वर्ल्डकपचे सामने खेळणार नाही असा पवित्रा घेतल्यानंतर आयसीसीने कारवाई करत त्यांच्या जागी स्कॉटलँडला संधी दिली. यानंतर पाकिस्तानने देखील यजमान भारताविरूद्धचा सामन्यावर बहिष्कार घालणार असल्याची घोषणा केली. मात्र अशा प्रकारे एकाच सामन्यावर बहिष्कार घालता येतो का आणि आयसीसीचा याबाबत काय नियम आहे याच्याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
नियमांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पाकिस्तान स्पर्धेतील एकाच सामन्यावर बहिष्कार घालू शकतो त्यांना हे करण्यापासून रोखण्यासाठी . आयसीसीचा असा कोणताच नियम नाहीये. मात्र असं असलं तरी आयसीसी असा निर्णय घेणाऱ्या संघाविरूद्ध आयसीसी कडक पावले उचलू शकते तसे आयसीसीचे कडक नियम आहेत.
जर पाकिस्तान १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत असेल तर आयसीसीने हे नियम लागू होतील.
आयसीसी प्लेईंग कंडिशन नियमाअंतर्गत जर एखादा संघ मैदनावर येण्यास नकार देत असेल तर ही सामना प्रतिस्पर्धी संघाला बहाल केला जातो. या सामन्याचे गुण प्रतिस्पर्धी संघाला म्हणजे या केसमध्ये भारताला मिळतील. मात्र यासाठी भारतीय संघ मैदानावर उपस्थित हवा.
जर भारतीय संघाचा कर्णधार सामन्यावेळी नाणेफेक करण्यासाठी मैदानावर उपस्थित असेल अन् पाकिस्तानी कर्णधार आला नाही तर सामना अधिकारी सामन्याचे अधिकृत २ गुण भारताला बहाल करेल.
फक्त इतकंच नाही तर यामध्ये एक छुपी पेनल्टी देखील आहे. नियम १६.१०.७ अनुसार पाकिस्तानने २० धावांची त्यांची पूर्ण इनिंग खेळली आहे असं गृहीत धरण्यात येईल आणि त्यात त्यांनी शून्य धावा केल्याचं देखील गृहीत धरलं जाईल. यामुळे त्यांना नेट रनरेटमध्ये मोठा तोटा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना सुपर ८ मध्ये पात्र होण्यासाठी देखील मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
पाकिस्तानसाठी हा नियम खरी डोकेदुखी ठरू शकतो. भारत - पाकिस्तान सामन्याकडे पैशाचा पाऊस पाडणारा सामना म्हणून पाहिलं जातं. जर हा सामना झाला नाही तर जिओस्टार सारख्या ब्रॉडकास्टर्सचे जवळपास २५ ते ३० मिलियन डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हे पैसे ब्रॉडकास्टर आयसीसीकडून वसूल करून घेऊ शकते. आयसीसी हा आर्थिक भूरदंड थेट पाकिस्तान क्रिकेट असोसिएशनकडून वसूल करून घेऊ शकते.
आयसीसी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वार्षिक उत्पन्नाच्या हिस्स्यातून ही रक्कम कापून घेऊ शकते. ही रक्कम त्यांच्या वार्षिक उत्पन्न हिस्सेदारीच्या ७० ते ८० टक्के इतकी आहे. त्यामुळं पाकिस्तान क्रिकेट बोर्डची अवस्था भिकाऱ्यापेक्षाही वाईट होण्याची शक्यता आहे.
आयसीसीच्या घटनेतील कलम २.४ ड अनुसार सदस्य क्रिकेट संघटनांनी त्यांचा व्यवहार हा स्वायत्त पद्धतीनं करणं अपेक्षित आहे. यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप मान्य नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन एहसान मनी यांनी सरकार आयसीसीच्या निर्बंधांपासून आमचं संरक्षण करणारा निर्णय घेतल्याचं वक्तव्य केलं असलं तरी याच्याकडे स्पर्धेचा नियमभंग म्हणूनच पाहिलं जाईल.
गेल्या १९९६ ते २००३ पासून अनेक संघांनी सुरक्षेच्या कारणास्तव सामन्यांवर बहिष्कार घातला आहे. मात्र पाकिस्तानने श्रीलंकेत होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार घातला आहे. हा तटस्थ व्हेन्यू आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सरकारला यात हस्तक्षेप करण्याचं कारणंच नाही. असं करणं थेट आयसीसीच्या घटनेच्या कलमाचं उल्लंघन ठरतं.