

Anil Kumble On Gautam Gambhir:
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताची अवस्था बिकट झाली आहे. दुसऱ्या डावात देखील दमदार फलंदाजी करणाऱ्या दक्षिण अफ्रिका भारतासमोर विजयासाठी जवळपास ५४८ धावांचे आव्हान ठेवले आहे. त्यामुळं दक्षिण अफ्रिका भारताला त्यांच्याच मातीत २ - ० नं लोळवते की काय अशी भीती वाटत आहे.
पहिल्या कसोटीत भारताचा ३० धावांनी पराभव झाला होता. दुसऱ्या सामन्यात देखील भारतीय संघ खूप अडचणीत सापडला आहे. दक्षिण अफ्रिकेनं सामन्यावरील आपली पकड मजबूत केली आहे. दरम्यान, चौथ्या दिवशी सामन्याच्या सुरूवातीला प्रशिक्षक गौतम गंभीर संघाला संबोधित करत होता. तत्पूर्वी यापूर्वी न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेवेळी गंभीरनं आम्हाला दिवसात ४०० धावा करणारी अन् दोन दिवस फलंदाजी करत सामना अनिर्णित करणारी टीम व्हायचं आहे असं वक्तव्य केलं होतं.
दरम्यान, भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेनं गौतम गंभीरला टोमणा मारत त्याची चांगलीच कानउघडणी केली. त्यानं गंभीर जी वक्तव्ये करतो त्यापद्धतीनं आता कामगिरी करणं गरजेचं असल्याचं सांगितलं.
अनिल कुंबळे समाचोलनावेळी म्हणाला, 'तुम्हाला आता तुमचे ते शब्द सिद्ध करावे लागतील. तुम्हाला आज जगातील सर्वोत्तम संघाविरूद्ध ते शब्द खरे करण्याची संधी आहे. त्यांनी कसोटीची वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. आजच्या सामन्यात तुम्हाला तुमचं चरित्र कसं आहे हे सिद्ध करण्याची संधी आहे. आम्ही इथं जिंकण्यासाठी आलो आहे. जिंकलो नाही तरी आम्ही लढाऊ वृत्तीने खेळून पराभव टाळण्यासाठी झुंज देऊ शकतो हे दाखवून देण्याची संधी आहे. तुम्ही जे काही बोलला ते ठीक आहे मात्र आज तुम्हाला मैदानावर तुमचे शब्द सत्यात देखील उतरवता आले पाहिजेत.
दुसऱ्या कसोटीत भारत पहिल्या डावात २०१ धावातच पॅव्हेलियनमध्ये पोहचला होता. त्यामुळं दक्षिण अफ्रिकेकडे पहिल्या डावात २८८ धावांची तगडी आघाडी होती. त्यानंतर त्यांनी आपला दुसरा डाव ४ बाद २६० धावांवर घोषित केला. त्यामुळं आता भारतासमोर विजयासाठी ५४८ धावांचे मोठे आव्हान असणार आहे. चौथ्या दिवसाचा अजून १८ षटकांचा खेळ बाकी आहे.