Bengal Ranji Team : बंगालच्या ‘रणजी’ संघात ममतादीदींच्या खास मंत्र्याची निवड! | पुढारी

Bengal Ranji Team : बंगालच्या ‘रणजी’ संघात ममतादीदींच्या खास मंत्र्याची निवड!

कोलकाता, पुढारी ऑनलाईन : भारताच्या सर्वात मोठ्या देशांतर्गत स्पर्धेची म्हणजे रणजी करंडक स्पर्धेची तयारी जोरात सुरू आहे. प्रत्येक राज्य या मोठ्या स्पर्धेत आपला सर्वात मजबूत संघ मैदानात उतरतो. तसेच रणजी ट्रॉफीतील कामगिरीमुळे अनेक खेळाडू टीम इंडियातही स्थान मिळवतात. मात्र, बंगाल राज्याच्या संघाबाबत सध्या एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बंगालने रणजी ट्रॉफीसाठी (Bengal Ranji Team) आपला संघ जाहीर केला असून या संघात चक्क राज्याच्या क्रीडा मंत्र्याचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय क्रिकेट संघासाठी एकदिवसीय आणि टी२० सामने खेळलेले मनोज तिवारी (Manoj Tiwari) सध्या पश्चिम बंगाल राज्याचे क्रीडा मंत्री म्हणून काम पाहत आहेत. मनोज तिवारी दीर्घकाळ क्रिकेट खेळत असून गेल्या वर्षी त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडणूकही लढवली होती. तृणमूल काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर तिवारी यांना क्रीडा व्यवहार मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आता दोन वर्षानंतर बंगालच्या (Bengal Ranji Team) २१ सदस्यीय रणजी संघात त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

बंगाल विधानसभा निवडणुकीत मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांनी शिबपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रतीन चक्रवर्ती यांचा पराभव करून विजय मिळवला. पण कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी रणजी ट्रॉफी खेळली गेली नव्हती. या वर्षी ही स्पर्धा खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक राज्य या मोठ्या स्पर्धेत आपला सर्वात मजबूत संघ मैदानात उतरवण्यासाठी सज्ज झाले आहेत. बंगाल संघात राज्याचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. तर संघाच्या कर्णधारपदी अभिमन्यू ईश्वरनची निवड करण्यात झाली आहे. टीम इंडियाचे माजी खेळाडू अरुण लाल हे बंगालचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

बंगालच्या संघाने (Bengal Ranji Team) गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. अंतिम सामना सौराष्ट्र संघा विरुद्ध होता. पण, सौराष्ट्रने डावाच्या आघाडीच्या जोरावर विजेतेपद पटकावले. त्यामुळे बंगालला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. त्या अंतिम सामन्यातही बंगाल संघाकडून मनोज तिवारी यांनीही भाग घेतला होता. त्यांनी फलंदाजी करताना ३५ धावांचे योगदान दिले. तिवारी यांनी भारतासाठी १२ एकदिवसीय आणि ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यांनी टीम इंडियासाठी २०१२ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध शेवटचा टी २० आणि २०१५ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

मनोज तिवारीने वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय शतक झळकावले आहे. तर त्याने १२५ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ५० पेक्षा जास्त सरासरीने ८९६५ धावा केल्या आहेत.

Back to top button