BCCI कडून मोठ्या क्रिकेट स्पर्धा रद्द! वाढत्या कोरोना संसर्गामुळे निर्णय | पुढारी

BCCI कडून मोठ्या क्रिकेट स्पर्धा रद्द! वाढत्या कोरोना संसर्गामुळे निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांत विविध निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान, ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाचा भारतीय क्रिकेटवरही परिणाम झाला आहे. BCCI ने आंतरराज्यीय अंडर-16 क्रिकेट चॅम्पियनशिप, विजय मर्चंट ट्रॉफी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक निवेदन जारी करताना ही माहिती दिली. विजय मर्चंट ट्रॉफी ९ जानेवारीपासून विविध ठिकाणी सुरू होणार होती.

बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह यांनी या संदर्भात सांगितले की, ‘संपूर्ण भारतात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. लोकांचे लसीकरण करूनही त्यांना संसर्ग होत आहे. आम्ही भारत आणि जगभरातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. पुढील काळात कोरोनाची प्रकरणे वाढतील असा अंदाज आहे. प्राथमिक कारण हे आहे की, स्पर्धकांचे अद्याप लसीकरण झालेले नाही. आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्या प्रतिभावान क्रिकेटपटूंचे आरोग्य धोक्यात घालून चालणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले.

जगभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत क्रिकेटमधील महत्त्वाच्या विजय मर्चंट ट्रॉफीवरही त्याचा परिणाम दिसून आला आहे. सलग दोन वर्षे ही ट्रॉफी खेळली गेलेली नाही. त्यामुळे युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळालेली नाही. बीसीसीआयने अलीकडेच सीनियर लेव्हल विजय हजारे ट्रॉफीचे यशस्वी आयोजन केले होते. परंतु सध्या ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे बीसीसीआयने क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (BCCI)

बीसीसीआयसमोर (BCCI) रणजी करंडक पूर्ण करण्याचे पुढील आव्हान असेल. रणजी ट्रॉफीचेही दोन वर्षांनंतर आयोजन करण्यात येणार आहे. शेवटची स्पर्धा २०२० मध्ये खेळली गेली होती. ज्यात सौराष्ट्रा संघाने विजेतेपद पटकावले होते. आगामी रणजी ट्रॉफी १३ जानेवारीपासून सुरू होणार असून त्यासाठी सर्व तयारी सुरू आहे. त्यामुळे या स्पर्धा होणार की नाही याबाबत उत्सुकता आहे.

Back to top button