Ajaz Patel : एजाजचा 10 का दम! न्यूझीलंडच्या ‘मुंबईकर’ गोलंदाजापुढे टीम इंडियाचे लोटांगण | पुढारी

Ajaz Patel : एजाजचा 10 का दम! न्यूझीलंडच्या ‘मुंबईकर’ गोलंदाजापुढे टीम इंडियाचे लोटांगण

पुढारी ऑनलाईन डेस्क :

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळ सुरू आहे. टीम इंडियाने कालच्या ४ बाद २२१ धावसंख्येपुढे फलंदाजी करण्यास सुरुवात केली. पण भारताची सुरुवात खराब झाली. भारताचा डाव १०९.५ षटकात ३२५ धावांत संपुष्टात आला आहे. किवी गोलंदाज एजाज पटेलने भीम पराक्रम करत वानखेडेवर एका डावात १० विकेट घेवून नवा इतिहास रचला आहे. यपूर्वी इंग्लंडच्या जीम लेकर (१९५६), भारताचा अनिल कुंबळे (१९९०) यांनी एका डावात १० विकेट्स घेण्याची किमया केली होती.

आज सकाळी साडेनऊ वाजता भारतीय संघाने कालच्या ४ बाद २२१ धावसंख्येपुढे खेळण्यास सुरुवात केली. दुस-याच षटकात एजाजने भारताला सलग दोन झटने दिले. किवी संघाचा फिरकीपटू एजाजने ७२ व्या षटकात चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे रिद्धीमान साहा आणि आर अश्विनला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या अक्षर पटेलने एजाजची हॅट्ट्रीक हुकवली. मयंक आणि साहा यांनी ५व्या विकेटसाठी १४४ चेंडूत ६४ धावांची भागीदारी केली.

लंच ब्रेकनंतर पुन्हा एजाजची जादू…

लंच ब्रेकनंतर पुन्हा एकदा एजाजच्या फिरकीची जादू पहायला मिळाली. त्याने ९९.५ व्या षटकात शतकवीर मयंक अग्रवालला आपल्या जाळ्यात अडकवले. टॉम ब्लंडेडने मयंकचा झेल पकडला. मयंकने ३११ चेंडूत १७ चौकार ४ षटकारांच्या जोरावर १५० धावा केल्या. त्यानंतर १०८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एजाजने अर्धशतकवीर अक्षर पटेलला पायचित केले. ही त्याची आठवी विकेट आहे. अक्षरने १२८ चेंडूत एक षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. त्यानंतर १०९.२ व्या षटकात जयंत यादवची विकेट घेवून तो विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर पोहचला. अखेर १०९. ५ व्या षटकात ती वेळ आणि सर्व क्रिकेट जग स्तब्ध झाले. कारण एजाजने मोहम्मद सिराजला बाद करत एकाच डावातील १० वा बळी मिळवला. १९९९ नंतर त्याने जागतिक क्रिकेटमध्ये इतिहास रचला.

कसोटी क्रिकेटमध्ये एजाज पटेलने एका डावात १० विकेट्स घेवून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात १० बळी घेणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. पटेलच्या आधी हा करिष्मा भारताच्या अनिल कुंबळे आणि इंग्लंडच्या जिम लेकर यांनी आहे. कुंबळेने १९९९ मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर पाकिस्तानविरुद्ध हा पराक्रम केला होता. त्याचवेळी इंग्लंडच्या जिम लेकरने एका डावात सर्व १० विकेट घेतल्या. १९५६ मध्ये लेकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका डावात १० विकेट्स घेतल्या होत्या.

मुंबईतच जन्मलेल्या एजाजने मुंबई कसोटीत ४७.५ षटकांत ११९ धावांत १० विकेट्स घेऊन विक्रम केला. यात त्याने १२ षटके निर्धाव टाकली. न्यूझीलंडच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एजाजने हा अद्भुत पराक्रम करून आपले नाव इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरांनी नोंदवले आहे.

सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन खेळाडू चांगलेच चमकले

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू झाला. या सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन खेळाडू चांगलेच चमकले. मयंक अग्रवालने शतक झळकावून भारतीय डावाला सावरले. तर पाहुण्या न्यूझीलंड संघाकडून एजाज पटेलने (Ajaz Patel) ४ विकेट घेऊन शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. एजाजने सामन्याच्या दुस-या दिवशी पहिल्या सत्रात आणखी दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

एजाज पटेल (Ajaz Patel) या ३३ वर्षीय भारतीय वंशाच्या गोलंदाजाने पहिल्या डावात ६ विकेट घेतल्या. यासह एजाज आशिया खंडात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५ बळी घेणारा न्यूझीलंडचा चौथा गोलंदाज ठरला आहे. यादरम्यान त्याने वेगवान गोलंदाज टीम साऊदीची बरोबरी केली. एजाजचे हे कसोटीतील तिसरे ५ बळी आहेत. आशिया खंडात १३ कसोटी सामन्यांमध्ये टीम साऊदीच्या नावावर तीन पाच बळी आहेत. एजाज त्याची ७ वी कसोटी खेळत आहे. या यादीत न्यूझीलंडचा दिग्गज फिरकी गोलंदाज डॅनियल व्हिटोरी पहिल्या क्रमांकावर आहे. व्हिटोरीने २१ कसोटींमध्ये आठ पाच बळी घेतले आहेत, तर सर रिचर्ड हॅडलीने १३ कसोटी सामन्यांमध्ये ५ वेळा पाच बळी घेतले.

भारतीय भूमीवर ६ विकेट घेणारा एजाज पटेल (Ajaz Patel) हा दुसरा परदेशी गोलंदाज आहे. याआधी इंग्लंडच्या जॉन लीव्हर यांनी १९७६ मध्ये दिल्ली कसोटीत हा पराक्रम केला होता. तसेच, अश्विनने सहावी विकेट घेतल्याने, तो भारतातील कसोटीच्या पहिल्या डावात किवी फिरकीपटूकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला. त्याच्या आधी जीतन पटेलने २०१२ मध्ये हैदराबाद कसोटीच्या पहिल्या डावात ४ विकेट घेतल्या होत्या.

आशिया खंडात सर्वाधिक ५ विकेट घेणारे न्यूझीलंडचे गोलंदाज

८ – डॅनियल व्हिटोरी (२१ कसोटी)
५ – सर रिचर्ड हॅडली (१३ कसोटी)
३ – टिम साउदी (१३ कसोटी)
३ – एजाज पटेल (७ कसोटी)*

एजाज (Ajaz Patel) जन्माने ‘मुंबईकर’…

न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू एजाज पटेलचा जन्म मुंबईत झाला आहे. त्याने शुक्रवारी भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी चारही विकेट घेण्याची किमया केली. तर शनिवारी सामन्याच्या दुस-या दिवशी दुस-याच षटकात सलग दोन विकेट घेवून यजमान टीम इंडियला मोठा झटका दिला. एकप्रकारे जन्मस्थानी स्वप्न साकार करण्याचा तो आनंद घेत असल्याचे चित्र आहे. काल दिवसभराच्या खेळात एजाजने २९ षटकांत ७३ धावा देत ४ बळी घेतले. यादरम्यान त्याने १० षटकेही निर्धाव टाकली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ४ बाद २२१ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात एजाजने भारतीय कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा आणि रविचंद्रन अश्विन यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कोहली, पुजारा आणि अश्विन यांना खातेही उघडता आले नाही.

‘स्वप्न अशीच पूर्ण होतात…’

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एजाज म्हणाला, अशीच स्वप्ने सत्यात उतरतात. खेळाच्या पहिल्या दिवशी येथे येणे आणि चार विकेट घेणे खूप मोठी गोष्ट आहे. वानखेडे स्टेडियमवरील ही कामगिरी माझ्यासाठी खूप खास आहे. पण माझे अर्धेच काम झाले आहे. आम्ही उद्या (शनिवार) सामन्यात पुनरागमन करू आणि उर्वरित सहा विकेट्स मिळवण्यासाठी संघर्ष करू. उद्याचा दिवस महत्त्वाचा असेल. कानपूरच्या तुलनेत ही खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करत आहे पण त्यासाठी योग्य दिशेने आणि ठिकाणी गोलंदाजी करणे महत्त्वाचे आहे, अशा भवना त्याने व्यक्त केल्या.

एजाज पटेलचा (Ajaz Patel) जन्म २१ ऑक्टोबर १९८८ रोजी मुंबईत झाला. एजाज ८ वर्षांचा असताना १९९६ साली त्याचे कुटुंब न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले. जेव्हा त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा तो डावखुरा वेगवान गोलंदाज होता पण नंतर प्रशिक्षकांच्या सल्ल्यानुसार तो फिरकी गोलंदाज बनला. ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याने न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पाकिस्तान विरुद्धच्या त्या सामन्यात त्याने पहिल्या डावात दोन आणि दुस-या डावात ५ विकेट घेतल्या. त्याच्या कामगिरीने क्रिकेट जगताचे लक्षवेधून घेतले.

भारतात प्रथमच खेळताना ३३ वर्षीय पटेलने एकापाठोपाठ तीन विकेट घेत यजमानांना दबावाखाली आणले. एजाजने शुभमन गिल (४४) याला बाद करून भारताला पहिला झटका दिला. मयंक आणि शुभमन यांनी पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केला. त्यानंतर एजाजने ३० व्या षटकात डबल धमाका केला. या षटकाच्या दुस-या आणि सहाव्या चेंडूवर अनुक्रमे चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीला खातेही न उघडताच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताने ८० धावसंख्येवर ३ विकेट्स पडल्या. चांगली सुरुवात केल्यानंतर संघ अडचणी सापडला. पण त्यानंतर मयंकने श्रेयस अय्यर सोबत डाव सावरला. मयंक आक्रमक खेळी करत होता तर श्रेयस संयमी खेळी करून त्याला साथ देत होता. दोघांमध्ये ८० धावांची भागिदारी झाली असताना एजाजने पुन्हा एकदा धक्का दिला. त्याने श्रेयस अय्यरल (१८) बाद करून ही भागिदारी मोडली. त्यानंतर मयंकने रिद्धीमान साहाच्या जोडीने अर्धशतकी भागिदारी करत पहिल्या दिवसा खेळ संपेपर्यंत ४ बाद २२१ धावसंख्येपर्यंत मजल मारली.

Back to top button