

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना धर्मशाला येथे सुरू आहे. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव 218 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने आक्रमक खेळी केली. भारताचे सलामीवीर रोहित आणि यशस्वी यांनी पहिल्या विकेटसाठी 104 धावांची भागिदारी केली. इंग्लंडचा गोलंदाज बशिरने विकेटकीपर फोक्सकरवी जैस्वालला बाद करत ही भागिदारी तोडली. जैस्वालने 57 धावांची खेळी केली. सध्या रोहित नाबाद 50 तर शुभमन नाबाद 26 धावांवर खेळत आहे. सामन्यात भारत अजून 83 धावांनी मागे आहे. (IND vs ENG 5th Test)
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली. बेन डकेट आणि जॅक क्रोली यांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. कुलदीपने ही भागीदारी फोडली. त्याने डकेटला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. डकेटने आपल्या खेळीत 27 धावा केल्या. यानंतर क्रॉलीने कसोटी कारकिर्दीतील 14वे अर्धशतक आणि भारताविरुद्ध पाचवे अर्धशतक पूर्ण केले. उपाहारापूर्वी कुलदीपने ऑली पोपला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकडून यष्टिचित करून इंग्लिश संघाला आणखी एक धक्का दिला. पोप 11 धावा करू शकला. (IND vs ENG 5th Test)
पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी 25.3 षटके टाकली. यामध्ये इंग्लंडने 2 विकेट गमावून 100 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या सत्रात इंग्लंडने 29.3 षटकात 6 गडी गमावून 94 धावा केल्या. एके काळी इंग्लंडची धावसंख्या ३८व्या षटकात दोन गडी बाद १३७ धावा अशी होती. क्रॉलीची विकेट पडल्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडला. 137 धावांवर दोन बाद अशी धावसंख्या असलेला संघ 58 व्या षटकात 218 धावांवर गारद झाला.
क्रॉलीने 108 चेंडूंत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 79 धावा केल्या. जो रूट 26 धावा करून बाद झाला, तर 100वी कसोटी खेळणारा जॉनी बेअरस्टो 29 धावा करून बाद झाला. कुलदीपने कर्णधार बेन स्टोक्सला खातेही उघडू दिले नाही. इंग्लंडची धावसंख्या 175 धावांवर असताना संघाने बेअरस्टो, रूट आणि स्टोक्सच्या विकेट्स गमावल्या. अश्विनने डावाच्या 50 व्या षटकात हार्टली (6) आणि वूड (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर अँडरसनला (0) पॅव्हेलियनमध्ये पाठवून इंग्लंडचा डाव 218 धावांवर आटोपला. बशीर 11 धावा करून नाबाद राहिला. गोलंदाजीमध्ये भारताकडून कुलदीप यादवने पाच विकेट घेतल्या. त्याच वेळी, रविचंद्रन अश्विनने 100 वी कसोटी सामन्यात चार विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. म्हणजे इंग्लंडच्या सर्व 10 विकेट फिरकीपटूंनी घेतल्या.
भारताचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. भारतासाठी कमीत कमी सामन्यांमध्ये 1000 कसोटी धावा करणारा तो फलंदाज ठरला आहे. त्याने चेतेश्वर पुजारा आणि विनोद कांबळी या महान फलंदाजांचे विक्रम मोडीत काढले आहेत. धर्मशाला येथील एचपीसीए क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात यशस्वी जैस्वालने ही कामगिरी केली.
जैस्वालने पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात 29 वी धावा घेताच कसोटी क्रिकेटमध्ये हजार धावांचा टप्पा गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 1000 धावा करणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी तो एक बनला. तो केवळ 9 कसोटी सामन्यांमध्ये भारतासाठी 1000 धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला आहे. त्याच्यापेक्षा कमी कसोटी सामन्यांमध्ये भारतासाठी 1000 धावा इतर कोणत्याही फलंदाजाने पूर्ण केल्या नाहीत. (IND vs ENG 5th Test)
सर्वात कमी दिवसांत 1000 कसोटी धावा पूर्ण करणारा यशस्वी जैस्वाल हा भारताचा फलंदाज आहे. त्याने पदार्पणानंतर 239 दिवसांत 1000 धावा पूर्ण केल्या. याबाबतीत दुस-या क्रमांकावर राहुल द्रविड आहे. त्याने 299 दिवसांत ही कामगिरी केली होती.
सर डॉन ब्रॅडमन यांनी केवळ सात कसोटी सामन्यांमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. ते अव्वल स्थानावर आहेत. त्याच्याशिवाय 7 किंवा 8 सामन्यांमध्ये कोणालाही असा पराक्रम करता आलेला नाही. 9 डावात 1000 कसोटी धावा करणारा जैस्वाल हा जगातील चौथा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी एव्हर्टन वीक्स, हर्बर्ट सटक्लिफ आणि जॉर्ज हॅडली यांनी ही कामगिरी केली आहे. (IND vs ENG 5th Test)
कुलदीप यादवने टीम इंडियासाठी शानदार गोलंदाजी करत एक खास विक्रम आपल्या नावावर केला. गेल्या 100 वर्षात सर्वात कमी चेंडू टाकून 50 विकेट्स घेण्याच्या बाबतीत कुलदीप पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. भारतीय गोलंदाजांच्या यादीतही त्याने अव्वल स्थान गाठले. कुलदीपने 1871 चेंडू टाकून 50 बळी पूर्ण केले आहेत.
100 वा कसोटी सामना खेळत असलेला जॉनी बेअरस्टो हा कुलदीपचा अर्धशतकी बळी ठरला. विकेटच्या ध्रुव जुरेलने बेअरस्टोचा झेल पकडला. कुलदीपच्या आधी भारतासाठी अक्षर पटेलने कसोटी क्रिकेटमध्ये 2205 चेंडूत तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 2465 चेंडूत 50 बळी पूर्ण केले होते. याशिवाय तिन्ही फॉरमॅटमध्ये 50 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा तो भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी भारतासाठी हा पराक्रम केला आहे
हेही वाचा :