Ruturaj Gaikwad Asian Games 2023 : एशियन गेम्ससाठी टीम इंडियाच्या कर्णधारपदी ऋतुराज गायकवाडची निवड | पुढारी

Ruturaj Gaikwad Asian Games 2023 : एशियन गेम्ससाठी टीम इंडियाच्या कर्णधारपदी ऋतुराज गायकवाडची निवड

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या वर्षी कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली एशियन क्रीडा स्पर्धा यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये चीनमधील ग्वांगझू येथे खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये आपला पुरूष आणि महिलांचा क्रिकेट संघ पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. (Ruturaj Gaikwad Asian Games 2023)

या स्पर्धेसाठी बीसीसीआयने महिला संघाचीही निवड केली आहे. मात्र, याच काळात भारतात वन-डे वर्ल्डकप होणार आहे. यामुळे या स्पर्धेसाठी पुरूषांचा ‘ब’ संघ पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. पुरूष ‘ब’ संघाचे नेतृत्व मराठमोळा ऋतुराज गायकवाड करणार आहे. या संघात तिलक वर्मा, रिंकू सिंह आणि जितेश शर्मा या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देखील संधी मिळाली आहे. (Ruturaj Gaikwad Asian Games 2023)

ऋतुराज गायकवाडला प्रथमच टीम इंडियाचे कर्णधारपद मिळाले आहे. एशियाई स्पर्धेत २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पुरुषांचे टी-२० क्रिकेटचे सामने खेळवले जाणार आहेत.

कर्णधार पद मिळाल्याने ऋतुराज आनंदी

एशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडियाचा कर्णधार बनल्याने ऋतुराज गायकवाडला आनंद झाला आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणातो की, ‘ही संधी दिल्याबद्दल बीसीसीआय, संघ व्यवस्थापन आणि निवडसमितीचे आभार. भारताकडून खेळायला मिळणे हीच मोठी गोष्ट असते. अशा मोठ्या स्पर्धेसाठी संघात निवड होणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ही माझ्यासाठी आणि संघातील इतर खेळाडूंसाठी देखील मोठी संधी आहे.

सुवर्णपदक जिंकणे हे स्वप्न : ऋतुराज

“एशियाई स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे माझे स्वप्न आहे. आयपीएल व्यतिरिक्त भारत-अ आणि वरिष्ठ संघ अनेक दौऱ्यांवर एकत्र आले आहेत. देशासाठी एशियाई स्पर्धा खेळणे ही मोठी गोष्ट आहे. मी स्पर्धेत जिंकण्याचा प्रयत्न करेन. सर्वांना अभिमान वाटेल, असे क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करणार आहे.

टीम इंडिया प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार

यंदाच्या एशियाई स्पर्धेत बीसीसीआय पहिल्यांदाच टीम इंडियाला पाठवणार आहे. याआधी २०१० आणि २०१४ साली झालेल्या स्पर्धेत टीम इंडियाने सहभाग घेतला नव्हता. बांगलादेश आणि श्रीलंकेने स्पर्धेत प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकले आहे.

भारताचा पुरूष संघ : ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहदम, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग. (Ruturaj Gaikwad Team India Captain)

स्टँड बाय खेळाडू : यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, साई सुदर्शन

हेही वाचा;

Back to top button