

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२३ च्या हंगामाला आज शुक्रवारी (दि ३१) सुरुवात झाली. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स असा पहिला सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्ससमोर १७९ धावांचे आव्हान ठेवले आहे.
ऋतुराज गायकवाडने ९ षटकार आणि ४ चौकारांच्या सहाय्याने ५० चेंडूमध्ये ९२ धावांची आक्रमक खेळी केली. ऋतुराजच्या फटकेबाजीच्या जोरावरच चेन्नईचा संघ १७८ धावांचा टप्पा गाठू शकला. चेन्नईच्या एकीकडे विकेट्स पडत असताना ऋतुराज गायकवाड चेन्नईचा डाव सावरत होता. चेन्नईकडून मोईन अलीने १७ चेंडूमध्ये २३ धावा, अंबाती रायडूने १२ चेंडूमध्ये १२ धावा केल्या. तर गुजरात टायटन्सकडून अल्जारी जोसेफ, मोहम्मद शमी आणि राशीद खानने प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या. राशिद खानने त्याच्या ४ षटकांमध्ये केवळ २६ धावा दिल्या.