पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेश दौऱ्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने बांगलादेशचा तब्बल २२७ धावांनी पराभव करत मालिकेतील व्हाईट वॉशपासून बचाव केला. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सलामीवीर म्हणून संधी दिलेल्या इशान किशनच्या द्विशतकी आणि विराट कोहलीच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघाने ४०९ धावांचा डोंगर उभा केला. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेला बांगलादेशचा संघ उवघ्या १८२ धावांत गारद झाला. भारतीय संघाच्या सर्व गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांसमोर तिखट मारा केला. यामध्ये शार्दुल ठाकूरने ३ तर अक्षर पटेल, उमरान मलिकने प्रत्येकी २ गडी बाद केले. तर, बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक 43 धावा केल्या. (IND vs BAN)
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराजने त्यांचे दोन्ही फलंदाज माघारी धाडत त्यांच्यावर दबाव निर्माण केला. अक्षर पटेलने अनमुल हकला ८ तर मोहम्मद सिराजने लिटन दासला २९ धावांवर बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. (IND vs BAN)
यानंतर बांगलादेशचा अनुभवी फलंदाज शाकिब अल हसनने भागीदारी रचत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु मुशफिकूर रहीमने २ तर यासिर २५ धावा करून त्याची साथ सोडली. कुलदीप यादवने शाकिबच्या खेळीला ४३ धावांवर लगाम लावत बांगलादेशला पाचवा धक्का दिला. शाकिब बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना चमक दाखवता आली नाही. अखेर भारताने बांगलादेशला १८२ धावांमध्ये गुंडाळत सामना तब्बल २२७ धावांनी जिंकला.
तत्पूर्वी, सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशसमोर ४१० धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून इशान किशनने वनडे कारकिर्दितील आपले पहिले शतक त्या पाठोपाठ द्विशतक ठोकले. तर विराट कोहलीने ७२ वे आंतरराष्ट्रीय शकत ठोकत रिकी पॉटिंगला मागे सोडले.
विराट (११३) आणि इशान किशन (२१०) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३०५ धावांची भागीदारी रचली. मैदानात उतरलेली भारताची मध्यमफळी चांगली कामगिरी करू शकली नाही. केएल राहुल पुन्हा एकदा चाहत्यांच्या पदरी निराश टाकली. तो ८ करून बाद झाला. तर, श्रेयस अय्यर ३ धावा करून बाद झाला. अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सहाव्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी करत भारताला ३९० धावांपर्यंत पोहचवले. यानंतर वॉशिंग्टन सुंदरने केलेल्या ३७ धावांनी भारताला ४०० चा टप्पा पार करून दिला.
हेही वाचा;