‘मुख्यमंत्री असल्याचं मुख्यमंत्र्यांच्याच लक्षात राहत नाही, तर काय कपाळ करावं’; एकनाथ शिंदेंवर अजितदादांचा हल्लाबोल | पुढारी

'मुख्यमंत्री असल्याचं मुख्यमंत्र्यांच्याच लक्षात राहत नाही, तर काय कपाळ करावं'; एकनाथ शिंदेंवर अजितदादांचा हल्लाबोल

श्रीगोंदा, पुढारी वृत्तसेवा: कधी- कधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याच लक्षात राहत नाही की, आपण या राज्याचे मुख्यमंत्री आहोत. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे ते सहज बोलून जातात. राज्याच्या मुखमंत्र्याच्याच आपण मुख्यमंत्री आहोत, हे लक्षात राहत नसेल तर काय कपाळ करावं…. अशा शेलक्या शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला.

कुकडी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित संवाद मेळाव्यात अजित पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुकडी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप होते. व्यासपीठावर बाळासाहेब नाहटा, बाबासाहेब भोस होते.

अजित पवार म्हणाले, शिंदे- फडणवीस अशी जोडगोळी आहे की मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर चाळीस दिवस दोघांनीच कॅबिनेट घेतली. कॅबिनेटमध्ये दोघे जोरात गप्पा मारायचे. त्यानंतर अठरा मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यांना पंधरा दिवस खातेवाटप केले नाही. एवढेच नाही तर तब्बल ४५ दिवसांनी पालक मंत्र्यांची यादी जाहीर केली. या गोष्टींचा राज्याचा विकासावर मोठा परिणाम झाला आहे. जर राज्याचे मुख्यमंत्री हे अंधश्रद्धेला खतपाणी घालत असतील तर आपले राज्य कुठे चालले आहे, असा प्रश्न पडल्याशिवाय शिवाय राहणार नाही. हातात गंडे- दोरे घालून काही होत नसते. मनगटात ताकद असावी लागते.

कधी -कधी एकनाथरावांच्या लक्षातच राहत नाही की, आपणच या राज्याचे मुख्यमंत्री आहोत. ते सहजपणे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे बोलून जातात….. अहो एकनाथराव तुम्ही मुख्यमंत्री आहात.राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याच आपण मुख्यमंत्री आहोत हे लक्षात राहत नसेल तर काय कपाळ करायचं का? असा हल्लाबोल अजित पवार यांनी चढविला. राज्यातील सत्ताधारी मंडळी नशेत धुंद झाली आहे. महापुरुषांच्या बाबतीत अपमानास्पद वक्तव्य करून त्यांना नेमकं काय साध्य करायचे आहे. या पुढे असली वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

Back to top button