T20 World Cup : भारतीय संघासोबत सपोर्ट स्टाफ म्हणून गेलेली ‘ही’ महिला आहे तरी कोण? | पुढारी

T20 World Cup : भारतीय संघासोबत सपोर्ट स्टाफ म्हणून गेलेली ‘ही’ महिला आहे तरी कोण?

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ शुक्रवारी पर्थमध्ये दाखल झाला आहे. भारताचा १४ सदस्यीय संघ आणि १६ सपोर्ट स्टाफ सदस्य गुरूवारी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले होते. सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि कर्मचारी सूट-बूटमध्ये दिसत आहेत. १६ ऑक्टोबरपासून टी-२० वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही माहिती दिली होती. पण, या फोटोमध्ये एकमेव महिला सदस्य असलेल्या राजलक्ष्मी अरोरा हिची चर्चा रंगली आहे.

भारताच्या १६ सपोर्ट स्टाफमध्ये एक महिला स्टाफ

भारताच्या १४ खेळाडूंसोबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे, मसाजर अरुण कानडे, टीम व्हिडीओ अ‍ॅनालिस्ट हरी मोहन, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप, थ्रो डाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी, डॉक्टर चार्ल्स मिंझ, स्ट्रेंथ प्रशिक्षक सोहम देसाई आणि मानसोपचार तज्ज्ञ पॅडी अप्टन हेही आहेत. त्याशिवाय मुख्य सायकोथेरपिस्ट कमलेश जैन, मीडिया मॅनेजर मौलिन पारिख, थ्रोडाऊन स्पेशालिस्ट नुवान सेनेविरत्ने, सहाय्यक फिजिओ योगेश परमार आदीही आहेत. पण या सर्वामध्ये चर्चा होत आहे ती फक्त राजलक्ष्मी अरोराची.

कोण आहे राजलक्ष्मी?

राजलक्ष्मी ही भारतीय संघासोबत प्रत्येक दौरा करत असते. ती बीसीसीआय मीडियाची प्रोड्यूसर म्हणून काम पाहते. बीसीसीआयच्या वेबसाईटवर अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडीओची जबाबदारी तिच्याकडे असते. खेळाडूंच्या मुलाखतीचे आयोजन करणे हे तिचे काम आहे.

ती या अगोदर २०१९ मध्ये बीसीसीआयच्या लैंगिक छळ तक्रारींसाठी नेमलेल्या समितीमध्ये होती. ती बीसीसीआयसोबत ७ वर्षांपासून काम करत आहे. तिने वृत्तपत्र व चॅनेलमध्ये काम केले आहे. २०१२मध्ये पुण्याच्या Symbiosis Institute Of Media And Communication मधून Activities and societies : Electronic journalism ची पदवी तिने घेतली आहे.

टीम इंडियाचे सराव सामने सुरु होणार (T20 World Cup)

रोहित शर्मा सद्या टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. काही दिवसात टीम इंडियाचे सराव सामने सुरु होणार आहेत.‘संघातील अनेक खेळाडू यापूर्वी ऑस्ट्रेलियात खेळलेले नाहीत आणि त्यामुळे आम्ही एवढ्या लवकर जात आहोत. पर्थ येथील उसळी घेणार्‍या खेळपट्टीवर आम्ही सराव करणार आहोत. या संघातील ७-८ खेळाडूच ऑस्ट्रेलियात खेळले आहेत. त्यामुळे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध आम्ही सराव सामने खेळणार आहोत आणि त्यानंतर आयसीसीचे दोन सराव सामने आहेतच,’ असे रोहित शर्मा म्हणाला. दुखापतग्रस्त खेळाडूच ही भारतासमोरील समस्या नाही, तर डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजांची सुमार कामगिरी ही खरी चिंतेची बाब आहे.

Back to top button