Asia Cup 2022 IND VS PAK : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचे 'हे' दिग्गज खेळाडू बसणार 'बाहेर'?
पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे लागल्या आहेत. (Asia Cup 2022 IND VS PAK) रविवार २८ ऑगस्ट रोजी हा महामुकाबला होणार आहे. मात्र या सामन्यात टीम इंडियात ११ खेळाडू कोण असणार? या प्रश्नांवर भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये सोशल मीडियावर खल सुरु आहे. तर दुसरीकडे झिंम्बाब्वे विरुद्धच्या तिसर्या वन डेमध्ये सलामीवीर केएल राहुल याने ३० धावा केल्याने अंतिम ११ खेळाडूंची यादी करताना संघ व्यवस्थापनासमोरही मोठे आव्हान असणार आहे.
२८ ऑगस्ट हा दिवस भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी खास असणार आहे. क्रिकेटमधील महामुकाबला पाहण्याची संधी त्यांना आहे. या दिवशी टीम इंडियाचे अंतिम ११ खेळाडू कोण याचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. याबाबत अनेक प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे. यामध्ये यष्टीरक्षक म्हणून मैदानात ऋषभ पंत उतरणार की दिनेश कार्तिक यावर मोठी चर्चा सुरु आहे. (Asia Cup 2022 IND VS PAK)
११ अंतिम खेळाडू कोण असावेत, यावर चर्चा सुरु असतानाच दोन दिग्गज खेळाडूंना बाहेर बसावे लागेल, असेही मानले जात आहे. यामध्ये यष्टीरक्षक दिनेश कार्तिक आणि फिरकीपटू अश्विन यांचा समावेश आहे. कारण दिनेश ऐवजी पंतला तर अश्विन ऐवजी रवींद्र जडेजाला स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नवोदित दीपक हुड्डा यालाही संघात स्थान मिळणार नाही, असाही अंदाज व्यक्त होत आहे. टीम इंडियामध्ये अंतिम ११ मध्ये स्थान मिळविण्यासाठी तीव्र स्पर्धा आहे.
असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघात क़ेएल राहुल, विराट कोहली. सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, आवेश खान यांना स्थान मिळेल. मात्र या सर्व चर्चाच आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या महामुकाबल्यात नेमकं कोण खेळणार हे २८ ऑगस्ट रोजीच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा :