विराट कोहली-रवी शास्त्री या जोडगोळीचा करेक्ट कार्यक्रम होणार! | पुढारी

विराट कोहली-रवी शास्त्री या जोडगोळीचा करेक्ट कार्यक्रम होणार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहली-रवी शास्त्री : आगामी टी-20 विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल होऊ शकतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये यूएईमध्ये होणाऱ्या विश्वचषकानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड भारतीय संघातून बाहेर पडू शकतात.

रवी शास्त्री यांनी बीसीसीआयच्या काही सदस्यांना कळवले आहे की, स्पर्धेनंतर ते टीम इंडियापासून वेगळे होण्याचा विचार करत आहेत. रवी शास्त्रींचा करार यावर्षी नोव्हेंबरमध्ये संपत आहे. दरम्यान, इतर काही सपोर्ट स्टाफ आयपीएल संघांशी आधीच चर्चा करत आहेत.

विराट कोहली-रवी शास्त्री : बीसीसीआयलाही नवीन गट हवा आहे

इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार बीसीसीआयलाही नवीन गट हवा आहे. शास्त्री यांनी 2014 ते 2016 टी -20 वर्ल्ड कप दरम्यान संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले. त्यानंतर अनिल कुंबळे यांची एका वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली. 2017 मध्ये अनिल कुंबळे गेल्यानंतर रवी शास्त्री यांना भारतीय क्रिकेट संघाचे पूर्णवेळ प्रशिक्षक बनवण्यात आले.

भारताची गोलंदाजी जगातील सर्वात धोकादायक बनवण्यात भरत अरुण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आर श्रीधर यांनी भारतीय खेळाडूंना सर्वात चपळ क्षेत्ररक्षक बनवले.

मात्र, रवी शास्त्रींच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०१९ साली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी आणि विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गमावली.

रवी शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेला नाही

आतापर्यंत रवी शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. दुसरीकडे, शास्त्री यांच्या कार्यकाळात भारत ऑस्ट्रेलियाला मायदेशात दोनदा कसोटी मालिकेत हरवू शकला आहे.

याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली.

याशिवाय भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अजिंक्य राहिला. भारताच्या बेंच-स्ट्रेंथमध्येही गेल्या चार वर्षांत अनेक पटीने वाढ झाली आहे.

ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर 2-1 च्या ऐतिहासिक मालिका विजयात भारतीय बेंच-स्ट्रेंथने आपली क्षमता दाखवली आहे.

संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यात योग्य समन्वय असणे अत्यंत महत्वाचे आहे. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या जोडीमध्ये हे खूप पाहिले गेले आहे.

मात्र, भारतीय क्रिकेट बोर्डाला आता बदल हवा आहे. मंडळाचा असा विश्वास आहे की संघाला पुढील स्तरावर नेण्यासाठी आणि जागतिक क्रिकेटमध्ये अजिंक्य होण्यासाठी बदल आवश्यक आहेत.

प्रोटोकॉलनुसार, टी विश्वचषकानंतर, बीसीसीआय नवीन मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज आमंत्रित करेल. राहुल द्रविड यांची नवीन प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली जाईल, असे संकेत काही बोर्ड अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहिलेल्या राहुल द्रविड यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसोबतचा (एनसीए) प्रमुख करार संपुष्टात आणला आहे.

बीसीसीआयने एनसीएमध्ये क्रिकेट प्रमुख पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत.

जुलै 2019 मध्ये द्रविड यांची एनसीए प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती.

त्यांनी यापूर्वी कनिष्ठ खेळाडूंसोबत भारत अंडर-19 आणि इंडिया अ संघाचे प्रशिक्षक म्हणून मोठ्या प्रमाणात काम केले आहे.

जर द्रविड यांनी एनसीएच्या प्रमुखपदासाठी पुन्हा अर्ज केला नाही, तर हे स्पष्ट आहे की ते टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारतील.

हे ही वाचलं का?

Back to top button