

पुढारी ऑनलाईन डेस्क : shane warne : वर्ष 1992, ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट मैदान. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना. तारीख होती 2 जानेवारी. भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यावेळी कोणालाच माहीत नव्हते की, जो ऑस्ट्रेलियन खेळाडू पदार्पणाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतो, तो जागतिक क्रिकेटचा महान गोलंदाज बनेल. हा सामना त्या खेळाडूसाठी खास होता कारण तो आंतरराष्ट्रीय पदार्पणाची कसोटी खेळत होता, पण या सामन्यात एका भारतीय फलंदाजाने त्याच्या गोलंदाजीची धुलाई केली.
टीम इंडिया 1992 मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. यादरम्यान भारताला पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची होती. कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना 2 जानेवारीपासून खेळवण्यात आला. हा शेन वॉर्नचा (shane warne) आंतरराष्ट्रीय पदार्पण सामना होता. हा सामना त्याच्यासाठी तर खासच होता, सोबतच रवी शास्त्रीसाठीही तो खूप खास ठरला. कारण होते शास्त्री यांनी या सामन्यात दमदार द्विशतक फटकावले.
भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 313 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडिया पहिला डाव खेळण्यासाठी मैदानात उतरली. भारताकडून रवी शास्त्री आणि नवज्योतसिंग सिद्धू सलामीला आले. सिद्धू खाते न उघडताच बाद झाला. पण शास्त्रींनी खेळपट्टीवर नांगर टाकला. त्यांनी 477 चेंडूत 206 धावा केल्या. या खेळीत शास्त्रींनी 17 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाने पहिल्या डावात 483 धावा केल्या. (shane warne)
यानंतर ऑस्ट्रेलियन संघ दुसरा डाव खेळण्यासाठी मैदानात उतरला. यादरम्यान भारताच्या भेदक मा-या पुढे त्यांचे फलंदाज टीकाव धरू शकले नाही आणि त्यांनी 8 गडी गमावून 173 धावा केल्या. पण सामन्याच्या पाचव्या दिवसामुळे सामना अनिर्णित राहिला. रवी शास्त्रींनीही या काळात 25 धावांत 4 बळी घेतले. रवी शास्त्री यांच्या चांगल्या फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी त्यांना 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आले. अशाप्रकारे शेन वॉर्न यांचा पदार्पणाचा सामन्यावर रवी शास्त्रींनी आपल्या दमदार कामगिरीची मोहोर उमटवली. या कसोटीत वॉर्न यांनी 1 विकेटसाठी 150 धावा दिल्या. त्या सामन्यात रवी शास्त्री यांनी द्विशतकी खेळी साकारली होती. (shane warne)