

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shreyas Iyer vs Virat Kohli : श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेत (IND vs SL) विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात आली आणि त्याच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) तिस-या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. अय्यरने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. तिन्ही सामन्यात त्याने अर्धशतकी मॅच विनिंग खेळी साकारल्या. अशा परिस्थितीत विराट कोहली परतल्यावर त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायची की अय्यरला करायला लावायचे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 57, 74 आणि 73 धावा केल्या आणि एकदाही तो बाद झाला नाही. अय्यरच्या दमदार कामगिरीमुळे भारताला मालिका 3-0 ने जिंकण्यात कोणतीही अडचण आली नाही.
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) इतक्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याबद्दल व्यवस्थापनाला आनंद होणे स्वाभाविक आहे. पण विराट संघात आल्यानंतर श्रेयसच्या बॅटींग ऑर्डरमध्ये परत बदल केला जाईल. संघ व्यवस्थापन श्रेयसला चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळवू शकतात. तर गरज पडल्यास विराट कोहली सलामीला येऊ शकतो.
"संघात इतकी स्पर्धा आहे की मला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळाल्याचा आनंद आहे, परंतु मला विचारले तर मी म्हणेन की मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते."
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 45 चेंडूत नाबाद 73 धावा केल्यानंतर श्रेयस अय्यरने पत्रकार परिषदेत आपले मन मोकळे केले. त्याने या मालिकेत 174 च्या प्रभावी स्ट्राईक रेटने 204 धावा केल्या आणि तो 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ठरला.
टीम इंडियाच्या बॅटींग ऑर्डरमधील तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीने (Virat Kohli) बराच काळ कब्जा केला आहे. त्यामुळे श्रेयसने केलेले विधान एकाअर्थी मोठे आहे. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना श्रेयसने 147 च्या स्ट्राईक रेटने आणि 68 च्या सरासरीने 340 धावा केल्या आहेत आणि आपला दावा सर्वात मजबूत केला आहे. या मालिकेत त्याने 20 चौकार आणि सात षटकार मारले. याशिवाय सूर्यकुमार यादवनेही आपली दावेदारी पेश केली आहे. सुर्यकुमारने त्याच्या फलंदाजीचा तडाखा वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दाखवला आहे. (Shreyas Iyer vs Virat Kohli)
श्रेयस अय्यर म्हणाला, 'टी-20 मध्ये पहिल्या तीनमध्ये खेळल्यानेच तुम्ही तुमचा डाव सुधारू शकता. त्यानंतर येण्यामुळे तुमच्यावर पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचे दडपण येते. मग तुमच्याकडे वेळ नसतो. मला विचारले तर मी म्हणेन क्रमांक तीनवर फलंदाजी करणे माझ्यासाठी सर्वोत्तम जागा आहे. तिन्ही डावात नाबाद राहून तंबूत परतने हे माझ्यासाठी खूप आनंददायी होते. पण संघात स्पर्धाही खूप जास्त आहे. संघातील प्रत्येक खेळाडूमध्ये सामने जिंकण्याची क्षमता आहे. मला प्रत्येक संधीचा फायदा घ्यायचा आहे. मी जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरतो तेव्हा मला डाव संपवून यायचे असते. ही माझी मानसिकता आहे.'
मात्र, भारतीय संघाच्या फलंदाजीची मधली फळी पाहता सलग तीन नाबाद अर्धशतके झळकावूनही श्रेयस तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित करू शकत नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. (Shreyas Iyer vs Virat Kohli)
या महिन्याच्या सुरुवातीला आयपीएल 2022 च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने 12.25 कोटी रुपयांना श्रेयस अय्यरला खरेदी केले गेले. त्याला तिसरी सर्वाधिक बोली मिळाली. पण तरीही त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन T20 सामन्यांमध्ये संधी मिळाली नव्हती. श्रेयसने शेवटच्या पाच सामन्यांमध्ये चार अर्धशतके झळकावली आहेत. ज्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ८० धावांच्या खेळीचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियातील T20 विश्वचषक स्पर्धेसाठी त्याने आपले स्थान निश्चित केले आहे असे त्याला वाटते का असे विचारले असता, तो म्हणाला, 'संघात स्पर्धा खूप आहे. मला वाटते की सध्या याबद्दल विचार करणे चुकीचे आहे. मी माझे स्थान पक्के करण्याबद्दल बोलू शकत नाही. ज्या सामन्यात संधी मिळते तिथे संघासाठी चांगली खेळी करणे यावरच सध्या माझा फोकस आहे.'
शॉर्ट-पिच चेंडूविरुद्धचा त्याचा खेळ याआधी संशयास्पद वाटला होता, परंतु श्रेयस म्हणाला की त्याने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही आणि त्याच्या ताकदीवर काम केले, ज्यात त्याला पहिल्या टप्प्यात यश मिळाले आहे.