Sourav Ganguly : बीसीसीआय अध्यक्षपदावरून सौरभ गांगुलींची उचलबांगडी होण्याची शक्यता! | पुढारी

Sourav Ganguly : बीसीसीआय अध्यक्षपदावरून सौरभ गांगुलींची उचलबांगडी होण्याची शक्यता!

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची खुर्ची धोक्यात आल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. गांगुली यांची लवकरच बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर सौरव गांगुलींना सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल केले जात आहे.

अलीकडच्या काळात विराट कोहलीच्या बाबतीत जे काही घडले, त्याला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना जबाबदार धरले जात आहे. दरम्यान, सौरव गांगुली यांची बीसीसीआयमधून सुट्टी होण्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. गांगुली यांच्यासह जय शाह यांची खुर्चीही धोक्यात आल्याची चर्चा आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोघांच्या भवितव्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

वास्तविक, बीसीसीआयमधील सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि जय शाह यांचा कार्यकाळ ऑक्टोबरमध्ये संपत आहे. कारण दोघेही 2019 मध्ये बीसीसीआयशी जोडले गेले होते. ऑक्टोबरमध्ये दोघांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांना पुन्हा बीसीसीआयमध्ये कायम केले जाते की त्यांच्या जागी नवा चेहरा येणार हे पाहावे लागेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौरव गांगुली (Sourav Ganguly) बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार होऊ शकतात आणि त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष येऊ शकतो. सौरव गांगुली यांची 2015 मध्ये बंगाल क्रिकेटच्या अध्यक्षपदी निवड झाली. सीएबीमधील (Cricket Association of Bengal) त्यांचे काम पाहून त्यांची बीसीसीआयच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

सौरव गांगुली (Sourav Ganguly) अध्यक्ष झाल्यानंतर बीसीसीआयमध्ये अनेक गोष्टी घडल्या. गांगुलींची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे त्यांनी राहुल द्रविड यांना टीम इंडियाशी जोडण्याचे काम केले. याशिवाय एनसीएच्या संचालकपदी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची नियुक्ती केली.

मात्र, सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) कार्यकाळात विराट कोहलीचे प्रकरण सर्वाधिक वादग्रस्त ठरले. कारण जेव्हापासून विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले तेव्हापासून सौरव गांगुली वादात सापडले आहेत. खरंतर विराटला कर्णधारपदावरून हटवल्यावर बराच वाद झाला. यानंतर सौरव गांगुलींनी विराटला कर्णधारपदावरून का काढून टाकले हे सांगितले होते. गांगुलींनी असेही सांगितले होते की, ‘मी विराट कोहलीला T20 संघाचे कर्णधारपद सोडू नये असे सांगितले होते. पण विराटने ते मान्य केले नाही.’

इकडे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने गांगुलीचे वक्तव्य फेटाळून लावत वादाला नवी दिशा दिली. विराटने एक पत्रकार परिषद घेत गांगुलींच्या म्हणण्याला खोटे पाडले. ‘टी20 संघाचे कर्णधार पद सोडताना मला बीसीसीआयच्या कोणत्याही पदाधिका-यांनी तू हे पद सोडू नको असे म्हटले नाही. उलट त्यांनी माझ्या निर्णयाला लगेच सहमती दर्शविली होती’, असे सांगत विराटने थेट गांगुली आणि बीसीसीआयला आरोपीच्या पिंज-यात उभे केले.

Back to top button