Virat Kohli Retirement : विराट कोहली ‘या’ दिवशी करणार निवृत्तीची घोषणा, तज्ज्ञांनी वर्तवली शक्यता | पुढारी

Virat Kohli Retirement : विराट कोहली ‘या’ दिवशी करणार निवृत्तीची घोषणा, तज्ज्ञांनी वर्तवली शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीने (Virat Kohli Retirement) १५ जानेवारीला कसोटी कर्णधारपद सोडले. या पदावरून तो पायउतार होत असल्याचे त्याने ट्विटकरून जाहीर केले. तो यापुढे कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करणार नाही. त्याच्या या निर्णयानंतर अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी विराटच्या निर्णयाचे स्वागत केले असून अनेकांनी त्याचा हा निर्णय धक्कादायक होता असे म्हटले आहे.

द. आफिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट अपयशी… (Virat Kohli Retirement)

मागच्या वर्षी विश्वचषक स्पर्धेनंतर कोहलीने टी २० संघाचे कर्णधारपद सोडले. तर द. आफ्रिकेच्या दौ-याआधी बीसीसीआयच्या निवड समितीने वनडे संघाच्या कर्णधारपदावरून त्याची उचलबांगडी केली. द. आफ्रिकेच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर कोहलीने कसोटीच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला आहे. कोहलीच्या कर्णधारपदाच्या सुवर्ण कारकिर्दीचा शेवट चांगला झाला नसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. द. आफ्रिका संघाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याची संधी त्याच्याकडे होती. पण यात विराट अपयशी ठरला आणि भारताला २-१ ने मालिका गमवावी लागली.

दरम्यान, विराट कोहलीने (Virat Kohli Retirement) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर तो लवकरच निवृत्ती घेण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. विराटच्या आधी कर्णधार असलेले एम. एस. धोनी आणि सौरभ गांगुली यांनी कर्णधारपद सोडल्यानंतर केवळ तीन वर्षांतच निवृत्ती घेत चाहत्यांना धक्का दिला होता.

धोनीने वयाच्या ३३ व्या वर्षी कर्णधारपद सोडले आणि विराट कोहलीनेही (Virat Kohli Retirement) कर्णधारपद सोडले तेव्हा त्याचे वय अवघे ३३ वर्षे आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जेव्हा सौरव गांगुलीने २००५ मध्ये कर्णधारपद सोडले तेव्हा त्याचे वयही ३३ वर्षे होते.

धोनीने अचानक कसोटीचे कर्णधारपद सोडले (Virat Kohli Retirement)

२०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान महेंद्रसिंग धोनीने अचानक कर्णधारपद सोडले. यानंतर तो तीन वर्षे ODI आणि T20 संघाच्या कर्णधारपदी राहिला. त्यानंतर २०१७ मध्ये धोनीने वनडे आणि टी २० संघाचे नेतृत्व कोहलीकडे सोपवले. यानंतर धोनी जुलै २०१९ पर्यंत क्रिकेट खेळत राहिला. २०१९ च्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यानंतर धोनी पुन्हा संघात आलाच नाही आणि जवळपास एक वर्षांनी १५ ऑगस्ट २०२० ला त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत चाहत्यांना मोठा झटका दिला.

सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी २००५ मध्ये एकदिवसीय आणि कसोटी कर्णधारपद सोडले. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे २००८ मध्ये ते निवृत्त झाले. गांगुली यांनी २००७ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. तर शेवटचा कसोटी सामना २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. मोहम्मद अझरुद्दीन यांच्याबाबत चर्चा करायची झाल्यास ते प्रकरण वेगळे आहे. मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे २००० साली अझरुद्दीन यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांचे संघात पुनरागमन होऊ शकले नाही.

विराट कोहलीचे बीसीसीआयशी मतभेद..

विराट कोहली ३३ वर्षांचा झाला आहे. टी २० च्या कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर त्याच्यात आणि बीसीसीआयमध्ये दुरावा निर्माण झाला. द. आफ्रिकेच्या दौ-यापूर्वी निवड समितीने विराटला मोठा धक्का देत त्याची वनडे संघाच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी केली होती. त्याच्या जागी रोहित शर्माला वनडे संघाचा कर्णधार करण्यात आले. त्यानंतर १५ जानेवारीला विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून कसोटी संघाचे कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले. त्याच्या या घोषणेनंतर कोहली किती दिवस खेळाडू म्हणून संघाचा भाग असेल, याबाबतही मतमतांरे पहायला मिळत आहेत. कर्णधारपद सोडल्यानंतर खेळाडूंना जास्त काळ संघाचा भाग राहता आलेले नाही, असे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात डोकावल्यास आपल्याला समजेल.

Back to top button