पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat 100th Test : कसोटी संघाचे कर्णधारपद सोडून भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ निर्माण करणारा विराट कोहली बीसीसीआयसोबत कोणत्याही प्रकारचा करार करण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही. असे सांगण्यात येत आहे की, BCCI ने विराटला त्याच्या १०० व्या कसोटीत कर्णधारपद भूषवण्याची ऑफर दिली होती, जी त्याने नाकारली आहे.
विराटने आतापर्यंत ९९ कसोटी सामने खेळले आहेत. फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. यातील पहिला सामना बंगळूर येथे होईल. विराट या कसोटीत खेळला तर त्याची कसोटी कारकिर्दीतील ही १०० वी कसोटी ठरेल (Virat 100th Test). या सामन्यात तू टीम इंडियाचे नेतृत्व कर असा सल्ला विराटला देण्यात आला. पण त्याने या ऑफरला स्पष्ट नकार दिला.
विराटने आपल्या कारकिर्दीत अनेकवेळा वैयक्तिक विक्रम नोंदवण्यात रस नसल्याचे सूचित केले आहे. संघाच्या विजयाला तो सर्वाधिक महत्त्व देतो. विराटने त्याच्या नेतृत्वाखाली ६८ पैकी ४० कसोटी सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. तो आणखी दोन वर्षे कर्णधार राहिला असता, तर कदाचित त्याने दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅम स्मिथला मागे टाकून जगातील सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारा कर्णधार बनला असता. पण द. आफ्रिकेतील कसोटी मालिका गमावणे जिव्हारी लागल्याने तसेच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली आणि खुद्द बीसीसीआयशी झालेल्या मतभेदामुळे त्याने या विक्रमाकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे १०० व्या कसोटी सामन्यात (Virat 100th Test) कर्णधारपद भूषवून तो निरोप घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने फोनवरून विराट कोहलीला १०० व्या कसोटी सामन्यात कर्णधारपद भूषवण्याची ऑफर दिली होती. यावर विराट म्हणाला की, एका सामन्याने काही फरक पडत नाही. मी तसा नाही. याचा अशाप्रकारे मी विचार करत नाही.
विराटने मागिल वर्षी टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. टी २० विश्वचषक स्पर्धा ही त्याची कर्णधार म्हणून अखेरची स्पर्धा ठरली. त्यानंतर निवड समितीने रोहित शर्माला कर्णधार पदाची जबाबदारी दिली. मायदेशातील न्यूझीलंड विरुद्धच्या टी २० मालिकेत संघ रोहितच्या नेतृत्वाखाली खेळला आणि मालिकेत विजय मिळवला. पण त्या मालिकेत विराट कोहली खेळला नव्हता. यानंतर द. आफ्रिका दौ-यापूर्वी बीसीसीआयने वनडे संघाच्या कर्णधारपदावरून विराटची उचलबांगडी केली आणि रोहित शर्मालाच वनडेच्या कर्णधारपदी नियुक्ती केली.
आता २०२२ या नव्या वर्षातील अवघे १५ दिवस उलटून गेले असतानाच विराटने कसोटीचे कर्णधारपदही सोडले. म्हणजेच भारत आता कसोटी क्रिकेटसाठी नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी-२० साठी कर्णधार बनवण्यात आले आहे. कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाच्या शर्यतीतही तो आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. केएल राहुल आणि ऋषभ पंतही स्पर्धेत असल्याची चर्चा आहे.