Kohli Era Ends : 68 दिवसांत विराट कोहलीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ कोणी केला? | पुढारी

Kohli Era Ends : 68 दिवसांत विराट कोहलीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ कोणी केला?

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीने (virat kohli) भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले असून आता तो फलंदाज म्हणून टीम इंडियामध्ये असेल. 2015 मध्ये भारताच्या कसोटी संघाची जबाबदारी स्वीकारलेल्या विराटने 2022 मध्ये भारताचे सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले आहे. विराटने गेल्या वर्षीच टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले होते आणि सुमारे एक महिन्यापूर्वी त्याची वनडे संघाच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली. (kohli era ends)

कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर विराट (virat kohli) कोणत्याही फॉरमॅटचा कर्णधार राहिलेला नाही. अडीच महिन्यांपूर्वी तो तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता. त्याने 68 दिवसांत तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद गमावले आहे. यानंतर भारतीय क्रिकेटमधील विराट कोहलीचे युग संपले आहे का? आणि तसे झाले तर आगामी काळात त्याची जागा कोण घेणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (kohli era ends)

प्रदीर्घ काळापासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीने (virat kohli) पहिल्यांदा टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याने 16 सप्टेंबर 2021 रोजी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती की, टी-20 विश्वचषकानंतर तो क्रिकेटचा सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करणार नाही. त्याने 8 नोव्हेंबर रोजी आपल्या कारकिर्दीतील शेवटचा T20 सामना खेळला आणि यामध्ये त्याने भारताचे नेतृत्व केले. (kohli era ends)

डिसेंबरमध्ये एकदिवसीय संघाचे कर्णधारपद गमावले…

टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआयने विराटकडून वनडेचे कर्णधारपदही हिसकावून घेतले आणि त्याच्या जागी रोहित शर्माला ही जबाबदारी देण्यात आली. रोहितने यापूर्वीच टी-20 संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. 10 डिसेंबर रोजी बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा केली आणि विराटच्या जागी रोहित आता एकदिवसीय संघाचा कर्णधार असेल असेही जाहीर ट्विटरवरून जाहीर केले. त्यानंतर या प्रकरणावरून बराच वाद झाला. कर्णधारपद सोडण्यापूर्वी काही वेळातच याबाबत माहिती मिळाल्याचे कोहलीने सांगितले होते, तर बीसीसीआय अध्यक्ष गांगुलींनी सांगितले की, विराटशी बोलल्यानंतरच रोहितला कर्णधारपद देण्यात आले. (kohli era ends)

आफ्रिका दौऱ्यादरम्यान कसोटी कर्णधारपद सोडले…

द. आफ्रिकेत कसोटी मालिका 1-2 ने गमावल्यानंतर विराट कोहली कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. यावेळीही त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विराट म्हणाला की, मी नेहमीच प्रत्येक कामात त्याचे 120 टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे, अशी भावना व्यक्त केली. आता या पुढे विराट तिन्ही फॉरमॅटमध्ये फलंदाज म्हणून संघात खेळणार आहे.

किंग कोहलीचे युग संपले का?

विराट कोहलीने भारतीय क्रिकेटवर दीर्घकाळ राज्य केले. 2012 मध्ये त्याने शतके ठोकून तरुण आणि आक्रमक खेळाडू अशी प्रतिमा निर्माण केली होती. यावेळी विराट भारताचा चमकता तारा होता. यानंतर प्रत्येक वर्षी त्याने क्रिकेट विश्वात नवीन उंची गाठली आणि अनेक विक्रम केले. यानंतर 2020 हे पहिले वर्ष होते जेव्हा त्याला शतक करता आले नाही. यानंतर त्याच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आणि 2022 च्या सुरुवातीला विराटने तिन्ही फॉरमॅटमधून भारताचे कर्णधारपद सोडले.

गेल्या दोन वर्षांपासून विराटच्या बॅटमधून शतक झळकलेले नाही. आता खराब फॉर्ममुळे त्याला संघातूनही वगळले जाऊ शकते. जोपर्यंत तो संघाचा कर्णधार होता तोपर्यंत ते शक्य नव्हते. अशा परिस्थितीत असे म्हणता येईल की आता भारतीय क्रिकेटमधील कर्णधार कोहलीचे युग संपले आहे, परंतु जर त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या तर तर तो अजूनही भारतीय क्रिकेट चाहत्यांचा आवडता खेळाडू राहू शकतो.

विराटनंतर कोण?

कोहलीच्या आधी धोनी भारताचा तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार होता आणि त्याने कर्णधारपद सोडण्यापूर्वीच सर्वांना माहीत होते की भारताचा पुढचा कर्णधार कोण असेल. धोनीने जवळपास दोन वर्षांच्या कालावधीत तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले होते. अशा स्थितीत विराटलाही कर्णधार म्हणून चमकण्याची संधी मिळाली, मात्र टी-20चे कर्णधारपद सोडल्यानंतर विराटने केवळ तीन सामने खेळले आहेत. हे तिन्ही कसोटी सामने होते आणि त्यात विराट भारताचा कर्णधार होता.

विराटनंतर रोहितला टी-20 आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. T20 मध्ये, रोहितने पहिल्या मालिकेत कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली. परंतु एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची अद्याप चाचणी व्हायची आहे. त्याचवेळी कसोटी संघाची कमानही त्याच्याकडे दिली जाऊ शकते, कारण रहाणेच्या जागी रोहितला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अशा स्थितीत विराटनंतर रोहित भारतीय क्रिकेटचा नवा बादशहा आहे, असे म्हणता येईल, पण रोहितसाठी ते सोपे नसेल.

रोहित शर्मालाही कसोटी संघाचा कर्णधार बनवल्यास त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करावे लागेल आणि आयसीसी स्पर्धा जिंकून द्याव्या लागतील. तसेच परदेशी मालिकेत भारताला विजय मिळवून द्यावा लागेल. 34 वर्षीय खेळाडूसाठी तिन्ही फॉरमॅट खेळणे आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणे सोपे नसेल.

Back to top button