

Sanjeev Kapoor rejected the offer for 'MasterChef India', saying, "Pay me one rupee more than Akshay."
पुढारी ऑनलाईन : प्रसिद्ध शेफ संजीव कपूर हे 2013 मध्ये ‘मास्टरशेफ इंडिया’चा भाग बनले होते. मात्र, 2010 मध्येही त्यांना या शोची ऑफर मिळाली होती, जी त्यांनी नाकारली होती.
संजीव कपूर हे भारतातील सर्वात लोकप्रिय शेफपैकी एक आहेत. 1990 च्या दशकात त्यांच्या ‘खाना खजाना’ या प्रसिद्ध कार्यक्रमामुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर ते ‘मास्टरशेफ इंडिया’मध्ये झळकले आणि त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. विशेष म्हणजे, ‘मास्टरशेफ इंडिया’च्या पहिल्या सिझनसाठीही त्यांना परीक्षक (जज) म्हणून आमंत्रित करण्यात आले होते, मात्र त्यांनी ती ऑफर नाकारली होती. त्या सिझनमध्ये अभिनेता अक्षय कुमारही परीक्षक होता.
अलीकडेच एका मुलाखतीत संजीव कपूर यांनी सुरुवातीला ‘मास्टरशेफ इंडिया’ची ऑफर का नाकारली आणि नंतर ती स्वीकारण्यामागचे कारण काय होते, याबद्दल खुलासा केला.
2010 मध्ये ‘मास्टरशेफ इंडिया’चा पहिला सिझन सुरू झाला होता. त्यावेळी शोच्या निर्मात्यांनी संजीव कपूर यांच्याशी संपर्क साधून अक्षय कुमारसोबत परीक्षक होण्याची ऑफर दिली होती. मात्र, संजीव कपूर यांनी ती नाकारली. यामागे त्यांची एक अट होती. त्यांना अक्षय कुमारपेक्षा अधिक मानधन मिळायला हवे होते, जरी ते फक्त एक रुपया जास्त असले तरी.
संजीव कपूर म्हणाले, “जेव्हा ते पहिल्यांदा माझ्याकडे आले, तेव्हा त्यांनी माझी अट मान्य केली नाही. माझी अट अशी होती की मला अक्षय कुमारपेक्षा जास्त पैसे मिळायला हवेत, मग ते फक्त एक रुपया जास्त असो. हा पहिला सिझन होता आणि माझ्याशिवाय दुसरे कोणीही हे काम करू शकत नव्हते, हे स्पष्ट होते. पण त्यांनी माझी अट मान्य केली नाही आणि मला तडजोड करायची नव्हती. त्यामुळे मी ऑफर नाकारली आणि त्या निर्णयावर मी समाधानी होतो.”
निर्मात्यांनी वारंवार विनंती करूनही संजीव कपूर यांनी पाहुणे म्हणून एका भागात सहभागी होण्यासही नकार दिला. ते म्हणाले, “मला सतत ऑफर येत होत्या. ते म्हणायचे, ‘सर, कृपया एका एपिसोडसाठी तरी या.’ पण मी स्पष्टपणे नकार दिला.”
तथापि, तिसऱ्या सिझनपर्यंत शोला अपेक्षित यश मिळत नव्हते. तेव्हा निर्मात्यांनी पुन्हा संजीव कपूर यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, “तिसऱ्या सिझनपर्यंत त्यांनी मला सांगितले की गोष्टी व्यवस्थित घडत नाहीत आणि त्यांना माझी गरज आहे. त्यांनी विचारले की काय करावे. मी सुरुवातीला नकार दिला, पण त्यांनी सांगितले की तुम्ही सांगाल तसेच आम्ही करू. त्यानंतर मी 2013 मध्ये शोमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.”
‘फूड-फूड’ चॅनेलमुळे घेतला निर्णय
संजीव कपूर यांनी सांगितले की, शोमध्ये सहभागी होण्याचा त्यांचा निर्णय वैयक्तिक फायद्यासाठी नव्हता, तर भारतातील फूड एंटरटेनमेंट उद्योगाच्या भविष्यासाठी होता.
ते म्हणाले, “त्या काळात आम्ही ‘फूड-फूड’ नावाचे टीव्ही चॅनेल चालवत होतो. ते मी सुरू केले होते आणि इतर शेफलाही लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करत होतो. मुद्दा फक्त तुम्हाला वैयक्तिकरित्या काय मिळते याचा नव्हता, तर संपूर्ण क्षेत्र मोठे होणे महत्त्वाचे होते.”
ते पुढे म्हणाले, “मला वाटले की जर भारतात ‘मास्टरशेफ’ अयशस्वी ठरला, तर फूड एंटरटेनमेंट उद्योगाला मोठा फटका बसेल. त्यामुळे मी शक्य ते सर्व करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच मी या शोमध्ये सहभागी झालो.”