

बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि आदर्श मानल्या जाणाऱ्या जोडप्यांपैकी एक असलेल्या रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी आशुतोष राणांनी वैवाहिक जीवनाबद्दल अतिशय भावनिक आणि अर्थपूर्ण विचार व्यक्त केले. प्रेम, विश्वास, संयम आणि एकमेकांचा आदर या गोष्टी यशस्वी संसारासाठी किती महत्त्वाच्या आहेत, हे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर चाहत्यांकडून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा आणि त्यांची पत्नी, लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्या लग्नाला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या औचित्याने आशुतोष यांनी लग्नाचा वरमाला घालतानाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शिवाय आशुतोष राणा यांनी सोशल मीडियावर एक मार्मिक आणि भावूक संदेश लिहिला आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
२००१ मध्ये या कपलने लग्न केल होते. पण, ५८ व्या वाढदिवसादिवशी पुन्हा एकदा त्यांनी नेहमी सोबत राहण्याचे वचन दिले होते. व्हायरल झालेला हा व्हिडिओ यावेळचाच आहे. आशुतोष आणि रेणुका यांच्या हातात वरमाला असून त्यांच्यासमोर केक आहे. या कपलच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये विवाहाचा खरा अर्थ उलगडून सांगितला आहे. त्यांच्या मते, विवाह ही एकमेकांचे व्यक्तिमत्व बदलण्याची प्रक्रिया नसून, उलट एकमेकांचे व्यक्तिमत्व फुलवण्याची आणि प्रगल्भ करण्याची संधी आहे. सुखी संसारासाठी केवळ प्रेम असून चालत नाही, तर पती-पत्नीमध्ये परस्परांप्रती असलेला आदर हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
ते पुढे म्हणतात की, ज्याप्रमाणे दोन नद्यांचा संगम झाल्याने ते स्थान पवित्र तीर्थ बनते, त्याचप्रमाणे गृहस्थाश्रम देखील एका तीर्थाप्रमाणे पवित्र आहे. लग्नानंतर दोन भिन्न विचार अग्नीला साक्षी मानून कायमच्या एक होतात, ज्यामुळे त्यांच्यातील वेगळेपणा नष्ट होऊन एकरूपता निर्माण होते. सुखी जीवनाचे मर्म आणि वैवाहिक जीवनाचे रहस्य यातच दडल्याचे त्यांनी म्हटलं.
या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचे श्रेय त्यांनी त्यांचे गुरुदेव भगवान दद्दाजी, आई-वडील आणि स्नेही मित्रपरिवाराच्या आशीर्वादाला दिले आहे. रेणुकाजींसोबतच्या या जीवन प्रवासात एकमेकांचे सोबती होता आले, त्याबद्दल त्यांनी ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.