Deool Band 2 review | शेतकऱ्यांच्या जीवनावर सडेतोड भाष्य 'देऊळबंद -२'
देऊळबंद - २(3 / 5)
निर्मिती : वटवृक्ष एन्टरटेनमेंट, जयश्री, जुईली आणि कैवल्य वाणी
दिग्दर्शक, कथा संवाद लेखक : प्रवीण तरडे
भूमिका : स्नेहल तरडे, मोहन जोशी,
प्रवीण तरडे, प्रसाद ओक, महेश मांजरेकर, ओम भूतकर, मंगेश देसाई, संस्कृती बालगुडे, देवेंद्र गायकवाड
संकलन : मयूर हरदास
सिनेमॅटोग्राफर : पार्श्वनाथ मिसळे
संगीत संयोजन : तन्मय भिडे, ऋतूराज साठे
- अनुपमा गुंडे
केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर देशातला बळीराजा, के वाराहारीरातीलच नाही, तर देशातला बळीराजार राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणाचा, नापिकीचा, बाजारव्यवस्थेचा, प्रशासकीय अनास्थेच्या आणि स्वतःच्याच रूढी, परंपरांच्या अनिष्ट प्रथांच्या गर्तेत खोल रूतत चालला आहे. त्यामुळे व्यवस्था आणि निसर्गाच्या अवकृपेने पिचलेल्या बळीराजाच्या चिघळलेल्या जखमांवर आजवर अनेक चित्रपट आले आहेत. आस्तिक आणि नास्तिकतेच्या परिघात बळीराजाच्या आजच्या वास्तवावर जळजळीत आणि सडेतोड भाष्य करून व्यवस्थेच्या आणि बळीराजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा चित्रपट म्हणजे देऊळबंद - २ मराठमोळ्या मातीतले दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी त्यांच्या मुळशी पॅटर्नसारख्या चित्रपटाच्या माध्यमातून शेती गिळकुंत करणाऱ्या धनदांडग्यांच्या उद्योगामुळे देशोधडीला लागलेला शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाची वाताहत यावर चोख प्रहार केला होता, तर देऊळबंद -१ मधून त्यांनी विज्ञान आणि अध्यात्मातील द्वंद्व मांडले होते.
'देऊळबंद - २' ची कथा आपल्या प्रत्येकाच्या गावातील शेतीच्या आणि शेतकऱ्याच्या दारुण जीवनाची. कर्जबाजारी, नापिकी, दुष्काळ, हमीभाव या वेढ्यात अडकलेले शेतकरी आत्महत्येला जवळ करतात. केवळ दुष्काळी पट्ट्यात नाही तर सधन पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यातही आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा वाढतो आहे. राज्यकर्ते, प्रशासन आणि निसर्गाच्या व्यवस्थेत भरडून निघालेल्या आपल्या पतीच्या (मंगेश देसाई) आत्महत्येमुळे व्यथित झालेली त्याची नास्तिक पत्नी संगीता पायगुडे (स्नेहल तरडे) देवाला जाब विचारते आणि त्याचीच परीक्षा घेते.
स्नेहल तरडे यांनी समस्त शेतकऱ्याच्या पत्नीची व्यथा अभिनयातून पोटतिडकीने मांडली आहे. पण त्याचबरोबर नास्तिकांच्या मनातील प्रश्नही उभे केले आहेत. देऊळबंद - १ प्रमाणेच दुसऱ्या भागात स्वामी समर्थांच्या रूपातील मोहन जोशी आपल्या अभिनयातील देवत्वाची छाप सोडून जातात. प्रवीण तरडे यांच्यासह सर्वच कलाकारांनी भूमिका चांगल्या साकारल्या आहेत. गाणीही प्रसंगानुरूप आणि गुणगुणावी अशी आहेत. बळीराजा समजून घेण्यासाठी प्रत्येकाने पाहावा असा चित्रपट आहे.

