

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बॉलिवूडचा खिलाडी' अभिनेता अक्षय कुमार (Akshay kumar) याने हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अत्यंत शिस्तबद्ध जीवनशैली आणि आपल्या जीवनात वेळेचे काटेकोरपणे पालन, ही त्याची खासियत... मात्र त्याच्या आयुष्यात असा एक प्रसंग आला की, अभिनयाशी काही देणं- घेणे नसताना एका प्रसिद्ध अभिनेत्याने त्याला एक सल्ला दिला आणि त्याचे नशीब पूर्णपणे बदलले. त्या अभिनेत्याच्या सल्ल्यानेचं बॉलिवूडला एक 'अॅक्शन हिरो' मिळाला.
अक्षय कुमारने 'आज' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रदार्पण केले. या चित्रपटात त्याची फक्त ७ सेकंदाची भूमिका होता. या चित्रपटात कुमार गौरव आणि अनिता राज मुख्य भूमिकेत होते.तर अक्षय कुमार मार्शल आर्ट्स इन्स्ट्रक्टरच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात अभिनेता कुमार गौरव याच्या पात्राचे नाव 'अक्षय' होते. हे पात्र त्याला इतके आवडले की त्याने 'राजीव भाटिया' हे नाव बदलून त्याने 'अक्षय कुमार' (Akshay Kumar) असे आपले नाव ठेवले.
रजत शर्मा यांच्या 'आप की आदलत' दरम्यान अक्षय कुमारने (Akshay Kumar) आपल्याला एका प्रसिद्ध अभिनेत्याने चित्रपटात जाण्यासाठी सल्ला दिल्याचे सांगितले. अक्षय कुमार 'जय शेठ' या फोटोग्राफरच्या हाताखाली लाईटमॅन म्हणून काम करायचा. त्यावेळी जय शेठ याच्याकडे अभिनेता अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, संगीता बिजलानी, गोविंदा यासारखे मोठे कलाकार फोटो काढायला यायचे. फोटो काढतेवेळी त्यांच्या चेहऱ्यावर लाईट पाडण्याचे काम अक्षय कुमार करायचा. एके दिवशी गोविंदा फोटो काढण्यासाठी आला आणि त्याने अक्षयकडे पाहून म्हटले, ये 'तु चांगलाय रे हिरो बन जा' हे वाक्य अक्षयसाठी मंत्रासारखे ठरले. त्यानंतर त्याने मॉडेलिंग करत ऑडिशन द्यायला सुरूवात केली. 'आज' या चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर त्याने सौगंध (१९९१), खिलाडी (१९९२), दीदार (१९९२), वक्त हमारा है (१९९३) यासह १५० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले असून त्याची ही यशस्वी अभिनय कारकीर्द आजही तितक्याच जोमाने सुरू आहे. फक्त एक 'अॅक्शन हिरो' म्हणूनच नव्हे, तर रोमँटिक आणि विनोदी भूमिकांतूनही त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.