‘आई कुठे काय करते’ : तेरा वर्षांनंतर अनिरुद्धच्या भावाची एन्ट्री | पुढारी

'आई कुठे काय करते' : तेरा वर्षांनंतर अनिरुद्धच्या भावाची एन्ट्री

मुंबई; पुढारी ऑनलाईन: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांचा भाऊ अविनाश देशमुखची एन्ट्री होत आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘अविनाश’ची भूमिका शंतनू मोघे यांनी साकारली आहे.

‘आई कुठे काय करते’ मालिका आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाल्यानंतर अरुंधतीने घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशमुख कुटुंबाला अरुंधतीचा विरह सहन होत नाही.

याच दरम्यान अनिरुद्धचा भाऊ म्हणजेच अविनाश देशमुखच्या येण्याने कुटुंबातल्या प्रत्येकालाच थोडा धीर मिळाला आहे. देशमुख कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा पुर्ववत करण्याची जबाबदारी सध्या अविनाशच्या खांद्यावर आली आहे.

अभिनेते मिलिंद गवळी आणि शंतनू मोघे या मालिकेत भावाची भूमिका साकारत आहेत. याआधी तेरा वर्षांपूर्वी या दोघांनी ‘हळद तुझी कुंकू माझं’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यामुळे या कलाकारासोबत तेरा वर्षांनंतर पुन्हा एकदा काम करण्याचा योग जुळून आल्याचा आनंद मिलिंद गवळी यांनी शेअर केला आहे.

शंतनु मोघे याची मालिकेत नव्याने एन्ट्री

‘शंतनु मोघे या अतिशय गोड माणसाबरोबर तेरा वर्षांपूर्वी ‘हळद तुझी कुंकू माझं’ या चित्रपटामध्ये पहिल्यांदा काम केलं होत. या टित्रपटाचे संपूर्ण शूटिंग साताऱ्यासह आजुबाजूच्या खेडेगावात झाले. शंतनूने पहिल्यांदा ‘हळद तुझी कुंकू माझं’ या मराठी चित्रपटातून पदार्पण केलं होतं. पहिलाच चित्रपट असला तरी कामाची जाण खूप छान होती, कष्ट करायची तयारी होती. त्याचा सगळ्यात उत्तम गुण म्हणजे तो माणूस म्हणून खूपच चांगला आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याच्याशी छान मैत्री झाली. मात्र त्यानंतर त्याची माझी भेट झाली नाही.

‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या निमित्ताने आम्ही तेरा वर्षांनी भेटलो. या मालिकेत अविनाशही अनिरुद्धला जवळपास पंधरा वर्षांनी भेटतो असा प्रसंग दाखवण्यात आला आहे. माझ्यासाठी शंतनू आणि अविनाशचं येणं हा योगायोगच आहे. खरतर अविनाश या व्यक्तिरेखेचं कास्टिंग जवळपास दोन महिने सुरु होतं. ही भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता होतीच. पण शंतनूचं नाव कळताच मला अतिशय आनंद झाला अशी भावना अभिनेते मिलिंद गवळी यांनी व्यक्त केली.’

तर शंतनू मोघेने मिलिंद गवळी यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळणं हे माझं भाग्य असल्याचे म्हटलं आहे. यात ‘आजपर्यंत अनेकांशी संपर्क आला, पण काही लोक आपल्या मनात एक अढळ स्थान निर्माण करतात. त्यापैकी एक म्हणजे मिलिंद गवळी. याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि मनाचा मोठेपणा.

मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मला तुमच्यासारख्या मोठ्या माणसाचा सहवास इतका जवळून लाभतोय. अविनाश आणि अनिरुद्धच्या नात्याचे अनेक कंगोरे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडणार आहेत.’

यासाठी पाहायला विसरु नका ‘आई कुठे काय करते’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

हेही वाचलंत का? 

Back to top button