

पुढारी ऑनलाईन : गेल्या आठ महिन्यापांसून राज्यात स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळून येत आहे. यावर्षी 1 जानेवारी ते 28 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे 2,337 रुग्ण आढळून आले आहेत. तर स्वाईन फ्लूने आतापर्यंत 98 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात पुण्यात सर्वाधिक ७७० स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळून आले असून, ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या गणेशोत्सव सुरू होत असून, यावर कोविड-१९ आणि स्वाईन फ्लूचे संकट आहे. स्वाईन फ्लूची रूग्ण संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अशक्तपणा, थकवा जाणवत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सणाच्या कालावधित आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन उपचार घ्या, असे आवाहन नागरिकांना राज्य आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यातील पारनेर, संगमनेेर पाठोपाठ कोपरगाव व नगर तालुक्यातील आणखी चौघांचा नुकताच स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला असून, रुग्णांची संख्या 23 वर पोहोचली आहे. कोपरगावातील दोघांचा, संगमनेर येथील एकाचा नाशिक येथे तर पारनेर, नगर तालुक्यांतील रुग्णांचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात झाला. गेल्या दोन सव्वादोन वर्षांपासून कोरोनाने ठिय्या मांडला आहे. या संसर्गाने हजारो व्यक्तींचा जीव घेतला असून, लाखो जनतेला बेजार केलेले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रभाव संपल्यात जमा आहे. तो जात नाही तोच स्वाईन फ्लू हजर झाला आहे.