

स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी व माजी आमदार उल्हास पाटील (Raju Shetti Ulhas Patil) यांच्यात २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीमुळे शेतकरी चळवळीतील कट्टर मैत्रीत दुरावा निर्माण झाला. मात्र या नेत्यांना दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या जिल्हा बँकेच्या उमेदवारीवरून एकत्रित आणल्याची खुमासदार चर्चा शिरोळ तालुक्यात रंगली आहे. शिरोळ तालुक्याच्या पूर्व भागात दोघांना एकाच गाडीतून एकाच शिटवरून दौरा करताना पाहून शेतकरी मात्र आनंदीत होत आहे. त्यामुळे निवडणूक जिल्हा बँकेची असली तरी, जोडणी विधानसभेची अशी चर्चा रंगली आहे.
राजकारणात कोण कुणाचे शत्रू नसतात. जसा संवाद तसे पात्र उभे करावे लागते. उसाच्या दरावरून आंदोलनाचे रान उठविणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि माजी आमदार उल्हास पाटील यांची (Raju Shetti Ulhas Patil) खूप घट्ट अशी मैत्री होती. परंतु २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या राजकीय घडामोडीत दोघांत दुरावा निर्माण झाला अन एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक बनले.
केडीसीसी बँकेच्या निमिताने हे दोन्ही बलाढ्य नेते तबबल आठ वर्षांनी एकाच गाडीतून, एकाच सीटवरुन मतदारांच्या गाठीभेटीसाठी फिरताना दिसत आहेत. या दोघांना एकत्र आणण्याची किमया तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून जिल्हा बँकेचे उमेदवार म्हणून घोषित झालेले श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांची आहे.
त्यांनी आपल्या इनोव्हा गाडीत एकाच सीटवर माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार उल्हास पाटील यांची आसन व्यवस्था केली खरी. मात्र राजू शेट्टी व उल्हास पाटील यांच्यातील अबोलपणा स्पष्ट दिसला. दोघांनीही आपापल्या खिडकीतून बाहेर पाहणे पसंद केले.
शेतकरी चळवळीकरीता फिरतानाच्या जुन्या आठवणी कदाचित त्या दोघांच्या मनात आल्या असाव्यात असे वाटते. असो, पण दोघेही तालुक्याच्या पूर्व भागात एकत्रित फिरल्याने शेतकऱ्यांना पूर्वीची शेतकरी संघटनेची ताकद एकवटल्याचे चित्र शेतकऱ्यांना दिसल्यामुळे शेतकरी पूर्णता आनंदीत झाल्याची चर्चा मात्र रंगताना दिसत आहे.
राजू शेट्टी व उल्हास पाटील यांनी आपली मैत्री कायम ठेवा असे अनेक ठिकाणी दोघांनाही शेतकऱ्यांनी बोलूनही दाखवले आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे सावकार मादनाईक हेही उल्हास पाटील यांच्यासोबत होते.
यामुळे पूर्वीची मैत्री जिल्हा बँक निवडणूकीच्या माध्यमातून एकत्रित आली आहे.
हे असेच राहिल्यास तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राजू शेट्टी व उल्हास पाटील पुन्हा एकत्र आल्यास नव्या राजकारणाला सुरुवात होईल.
अनेकांनी उल्हास दादा मागे फिरा जुने ऋणाबद्ध जुळवा असे मत व्यक्त केले जात आहे.