

गणेश विनोदे
वडगाव मावळ: सहकाऱ्यांच्याच असहकारामुळे आगीतून उठले अन् फुफाट्यात पडले अशी अवस्था मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मधील संचालकांची झाली असून, बाजार समिती हा तालुक्यात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
बराच काळ प्रशासकीय कारभार असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक तीन वर्षांपूर्वी झाली होती. जवळपास प्रत्येकी 10 लाख रुपये खर्च करून नवीन संचालक निवडून आल्याने व राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने या संचालक मंडळाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. त्या वेळी बाजार समितीच्या सभापतीपदी संभाजी शिंदे व उपसभापती पद नामदेव शेलार यांची नियुक्ती झाली होती. तसेच सर्व संचालकांना सभापती, उपसभापती पदाची संधी देण्याचा पक्षांतर्गत निर्णयही घेण्यात आला होता. परंतु तब्बल तीन वर्ष सभापती शिंदे व उपसभापती शेलार यांनी पदाचे राजीनामे दिले नाही, त्यामुळे इतरांना संधी मिळाली नाही.
अखेर महिन्यापूर्वी असंतुष्ट असलेल्या सर्व संचालकांनी एकत्रित येत सभापती, उपसभापती यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीने पावले उचलली. दरम्यान अविश्वास ठरावाची शक्यता डोळ्यांसमोर ठेवून सभापती व उपसभापतींनी आपले राजीनामे तातडीने दिले. त्यामुळे संचालकांनी राजीनाम्यासाठी केलेला हा प्रयत्न ठरला.
त्यानंतर सभापती, उपसभापती पदाची निवडणूक लागली. उरलेल्या दोन वर्षांत दोन दोन महिने का होईना प्रत्येकाला संधी मिळणार अशी अपेक्षा सर्व संचालकांना होती. प्रत्यक्षात मात्र या निवडणुकीत झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीत एकूण 18 पैकी राष्ट्रवादीचे 13 संचालक असताना सभापतीपद पटकावण्यात भाजपला यश आले.
स्पष्ट बहुमत असताना पक्षातील फुटीरांमुळे पक्षावर पराभवाची नामुष्की आली, त्यामुळे हा पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला. आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी या पराभवाची गंभीर दखल घेत बाजार समितीच्या राष्ट्रवादीच्या संचालकांची तातडीची बैठक घेतली व सर्वांनी राजीनामे द्या अन्यथा हकालपट्टी करणार, असा गंभीर इशारा दिला.
दरम्यान, दुसऱ्याच दिवशी आमदार शेळके यांच्या आदेशाची पालन करत 13 पैकी नऊ संचालकांनी आपले राजीनामे सहाय्यक निबंधकांकडे सुपूर्द केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उर्वरित 4 संचालकांनी राजीनामे दिले आणि बाजार समिती बरखास्त होण्याचा मार्ग मोकळा झाला.
एकंदर तीन वर्षे न झालेले राजीनामे घेण्यासाठी सगळे संचालक एकत्र आले आणि या एकजुटीला यश आले. परंतु, नवीन सभापती निवडताना मात्र हीच एकजूट तुटली आणि सर्वांच्या अपेक्षांवर पाणी पडले. त्यात आमदार शेळके यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे राजीनामेही द्यावे लागले आणि भाजपचे संचालकही अडचणीत आले. त्यामुळे आगीतून उठले अन् फुफाट्यात पडले असे म्हणण्याची वेळ आली आहे.
पहिलीच मीटिंग फक्त चर्चेपुरती ठरली !
सभापती, उपसभापती निवड झाल्यानंतर आज बाजार समिती संचालक मंडळाची पहिलीच मीटिंग होती. परंतु, 18 पैकी 13 जणांनी राजीनामे दिले, त्यामुळे या मीटिंगला फक्त भाजपचे 5 व राजीनामा न दिलेले 1 असे फक्त 6 संचालक उपस्थित होते. त्यामुळे कोरमअभावी सभा होऊ शकली नाही आणि ही मीटिंग फक्त चर्चेपूर्तीच ठरली.