

नवलाख उंबरे: अलीकडील गॅसदरवाढ आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध न होण्याच्या समस्येमुळे हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. या परिस्थितीत अनेक हॉटेलचालकांनी खाद्यपदार्थांच्या दरात वाढ केली आहे.
परिणामी, सामान्य नागरिकांच्या खिशावर ताण पडत असून, त्यांच्या जीवनशैलीत बदल होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांनी हॉटेलच्या जेवणाकडे पाठ फिरवली असून घरगुती जेवणाकडे कल वाढला आहे.
वाढलेल्या दरांमुळे सामान्य नागरिकांनी हॉटेलमध्ये जेवण करण्याचे प्रमाण कमी केले आहे. विशेषतः सुट्टीच्या दिवशी किंवा कुटुंबासह बाहेर फिरायला जाताना नागरिक आता हॉटेलमध्ये जेवण करण्याऐवजी घरूनच डबा घेऊन जाण्यास प्राधान्य देत आहेत. घरगुती जेवण अधिक किफायतशीर आणि आरोग्यदायी असल्याने नागरिकांचा त्याकडे कल वाढताना दिसत आहे.
एकंदरीत, गॅस दरवाढ आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे हॉटेल व्यवसाय आणि ग््रााहक दोघांनाही आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून सरकारने गॅस दर नियंत्रित करणे आणि पुरवठा सुरळीत ठेवणे गरजेचे असल्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.
पूर्वी आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत हॉटेलमध्ये जेवण करणे हा एक आनंदाचा भाग होता. मात्र, सध्याच्या वाढलेल्या दरांमुळे ते टाळावे लागत आहे.
गणेश भोसले, स्थानिक नागरिक
व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढले असून, पुरवठाही अनियमित आहे. त्यामुळे स्वयंपाकाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. झालेल्या वाढीमुळे हॉटेल चालवणे अधिक खर्चिक झाले आहे.
अविनाश नाटक, हॉटेल व्यावसायिक