

पिंपळे निलख: पिंपळे सौदागर येथील पी. के. चौक ते कोकणे चौका दरम्यानच्या रस्त्यालगत उभारलेल्या लिनियर गार्डनमध्ये नुकतेच “झाडे लावा, झाडे जगवा” मोहिमेंतर्गत वृक्षारोपण व सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, काही दिवसांतच या घोषणेचा फोलपणा उघड झाला आहे. पालिकेकडून गार्डनच्या दोन्ही टोकांना कंपोस्ट खतनिर्मितीसाठी खड्डे व कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था उभारण्यासाठी पत्र्याचे शेड उभारणे सुरू झाले; पण हे काम करताना जेसीबीद्वारे थेट उद्यानातच बेदरकार खोदकाम करण्यात आले.
यामुळे नव्याने लावलेली तसेच जुनी वाढलेली अनेक झाडे जेसीबीखाली दबली, काहींची मुळे उघडी पडली तर काही झाडे मोडून पडली. “जर झाडे मोडायचीच होती, तर ती लावली कशाला?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. उद्यान परिसरात दररोज लहान मुले, अबालवृद्ध, ज्येष्ठ नागरिक शांतता व विरंगुळ्यासाठी येत असतात.
मात्र, काम सुरू असल्याबाबत कोणतेही सूचना फलक लावण्यात आले नव्हते. परिणामी जेसीबीच्या अवतीभोवतीच लहान मुले खेळताना दिसत आहेत. ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असून, दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
नियोजनाचा अभाव की निष्काळजीपणा?
काम सुरू करण्यापूर्वी झाडे वाचवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना दिसून आली नाही.
झाडांभोवती संरक्षक कुंपण उभारले गेले नाही.
रूट-प्रोटेक्शन झोन निश्चित केला गेला नाही.
झाडांजवळ जेसीबी ऐवजी हाताने काम करण्याचा पर्याय वापरला गेला नाही.
सुरक्षेसाठी बॅरिकेडिंग, चेतावणी फलक व कर्मचाऱ्यांची देखरेख ठेवली गेली.
आम्ही दररोज मुलांना घेऊन या उद्यानात येतो. शांत वातावरण मिळावे म्हणून हे गार्डन तयार केले, पण आता येथील शांतता लयास गेली आहे. विकासकामे करताना सूचना फलक लावणे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. लहान मुले मशीनजवळ खेळताना दिसतात, हे खूप धोकादायक आहे.
अश्विनी घुले, स्थानिक.
आमच्याकडे याबाबतची रितसर परवानगी मिळाली आहे. ते पत्रदेखील आमच्याकडे आहे. उद्यानामध्ये पत्र्याची रूम व कंपोस्ट खत तयार करत असल्याने योग्य ती काळजी घेऊनच काम केले जाईल.
अजय कुमार, उद्यान विभाग, ड क्षेत्रीय कार्यालय