

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावली असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या घटनांमध्ये कोणतेही नुकसान झाले नाही; मात्र अजूनही अनेक ठिकाणी धोकादायक स्थितीतील झाडे उन्मळून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. असे असूनही याकडे पालिकेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
शाळांच्या परिसरात, मुख्य चौकांमध्ये, रस्त्यालगत, गर्दीच्या ठिकाणी आणि वाहनतळांमध्ये उभी असलेली अनेक झाडे उन्मळून कोसळण्याच्या स्थितीत आहेत. काही झाडे एका बाजूला धोकादायकरीत्या झुकलेली, काहींची मुळे जमिनीबाहेर आलेली, तर काहींच्या जड फांद्या थेट पादचारी मार्गावर लोंबकळत आहेत.
ही परिस्थिती एखाद्या नैसर्गिक संकटामुळे नव्हे, तर दुर्लक्षामुळे निर्माण झाल्याचे शहरभर केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत समोर आले. दरवर्षी पावसाळ्यात झाडे उन्मळून पडतात, वाहनांचे नुकसान होते, नागरिक जखमी होतात, काही वेळा जीवही जातात, अशा घटना घडूनही पालिकेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पंधरा ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात परिसरात १५ ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. निगडी पोलिस स्टेशन, कुणाल आयकॉन रोड पिंपळे सौदागर, त्रिवेणीनगर निगडी, स्वामी मंदिर किवळे गावठाण, गुळवेवस्ती भोसरी, इंद्रायणीनगर भोसरी, खराळवाडी पिंपरी, चक्रपाणी वसाहत भोसरी, आरटीओ ऑफिस मोशी, शास्त्रीनगर कासारवाडी, टिळक हॉटेल दापोडी, नाशिक फाटा कासारवाडी, खंडोबामाळ आकुर्डी, केशवनगर चिंचवड, मयुर इस्टेट वाकड.
पावसाळ्यापूर्वी वृक्षांचे सर्वेक्षण झाले का?
दरवर्षी पालिका प्रशासनाकडून मान्सूनपूर्व तयारीच्या घोषणा केल्या जातात. नालेसफाई, रस्त्यांची दुरुस्ती, आपत्ती व्यवस्थापन याबरोबर धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण आणि छाटणीही केली जाते; मात्र प्रत्यक्षात शहरातील परिस्थिती वेगळेच चित्र दाखवते. वृक्षगणना झाले असेल तर इतकी झाडे अजूनही धोकादायक अवस्थेत कशी, तसेच हे धोकादायक वृक्ष कोसळून दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संभाव्य अपघातापासून बचावासाठी उपाययोजना काय ?
यंत्रणा अनेकदा घटना घडल्यानंतर तत्पर दिसते. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, महापालिका कर्मचारी घटनास्थळी पोहोचतात. पण प्रश्न असा आहे की, ही धावपळ अपघात टाळण्यासाठी आधी का दिसत नाही, धोक्याची चिन्हे स्पष्ट दिसत असतानाही कारवाई न करणे म्हणजे संकटाला निमंत्रण देण्यासारखे आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील विभागीय अधिकाऱ्यांना धोकादायक स्थितीतील झाडांचे तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा परिसर, चौक, पालखी मार्ग तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणांवरील धोकादायक झाडांचा अहवाल वृक्षप्राधिकरणाकडे पाठवून आवश्यक मान्यता घेऊन कारवाई केली जात आहे. विद्युत वाहिन्यांजवळील झाडांच्या छाटणीसाठी महावितरण विभागाशी समन्वय साधला आहे.
महेश गारगोटे, मुख्य उद्यान अधीक्षक तथा वृक्षाधिकारी, उद्यान व संवर्धन विभाग