

पिंपरी: राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांच्या पदरी प्रशासकीय अनास्थेमुळे निराशा आली आहे. जनगणनेच्या सर्वेक्षणासाठी शासनाकडून पुरवण्यात आलेले साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने शिक्षक आणि प्रगणकांमध्ये असंतोष पसरला आहे.
जनगणनेसाठी प्रगणकांना दोन पेन, दोन पेन्सिल, पॅड, एक मार्कर पेन, टोपी आणि जनगणनेचे साहित्य ठेवण्यासाठी पिशवी असे साहित्य देण्यात आले आहे. या साहित्यांपैकी काही शिक्षकांना फक्त पेन, पेन्सिल आणि मार्कर मिळाले आहेत. जनगणनेसाठी पायपीट करणाऱ्या आणि माहिती संकलित करणाऱ्या प्रगणकांना देण्यात आलेल्या साहित्याबाबत प्रशासनाने कमालीची काटकसर केल्याचे दिसत आहे.
सुकलेले मार्कर पेन
घरावर नंबर टाकण्यासाठी आणि नोंदी करण्यासाठी पुरविण्यात आलेले मार्कर पेन काही तासांतच सुकत असून, त्यांची शाई अत्यंत फिकट आहे. दोन ते तीन घरांवर नंबर टाकले की मार्करमधील शाई पुसट होत आहे. यामुळे शिक्षकांना स्व:खर्चाने बाजारातून मार्कर पेन खरेदी करावे लागत आहेत.
सुट्यांमुळे घरे बंद
सध्या तापमानात वाढ होत असून, याचा त्रास शिक्षकांना सहन करावा लागत आहे. शाळांना सुट्या असल्याने अनेक घरे बंद दिसत आहेत. तसेच, बंद घरांचा तपशील प्राप्त होत नसल्याने घरगणनेमध्ये अडथळा होत असून, पुन्हा गृहभेटी द्यावी लागत आहे. सध्या उन्हाळी सुटी असल्याने अनेक कुटुंब बाहेरगावी गेली आहेत. याचा परिणाम जनगणनेवर होत आहे.
इमारतींना लिफ्ट नाही, प्रगणकांची दमछाक
शहरातील काही भागात गृहनिर्माण सोसायटीअंतर्गत उंच इमारती झाल्या आहेत. मात्र, तेथे लिफ्टसारख्या सोयी नसल्याने माहिती घेण्यासाठी शिक्षकांना जिन्याने चढउतार करावे लागत आहे. त्यामुळे प्रगणकांची चांगलीच दमछाक होत आहे.
शौचालय नसले तरी, आहे म्हणून नोंद!
जनगणनेच्या प्रशिक्षणादरम्यान प्रगणकांना घराची माहिती घेताना शौचालय नसले, तरी घरात शौचालय आहे असे लिहिण्यास सांगितले जात असल्याचे एका प्रगणकाने सांगितले. शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविले जात आहे. तसेच, महापालिकेव्दारे हगणदारीमुक्त शहर ही मोहीम राबविली जाते. तरीदेखील ज्यांच्या घरात शौचालय नाही, अशा घरात शौचालय असल्याची नोंद करायला सांगितली जात आहे. प्रशासनाकडूनच चुकीची माहिती भरण्यास सांगितले जात असल्याने प्रगणकांचा व शिक्षकांचा नाईलाज झाला आहे.
जनगणनेसाठी जनजागृतीचा अभाव
शासनाने जनगणनेसाठी म्हणावी तेवढी जनजागृती केलेली नाही. त्यामुळे नागरिकांना जनगणना म्हणजे काय हे माहिती नाही. घरात गॅस, टीव्ही, शौचालय आहे का? असे प्रश्न विचारल्यावर नागरिकांचा वाईट अनुभव शिक्षकांना येत आहे. त्यामुळे जनगणनेची आणखी जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
माहिती भरताना सर्व्हर डाऊन
जनगणना करताना शासनाकडून दिलेल्या ॲपमध्ये संकलित केलेली माहिती शिक्षकांनी भरायची आहे. मात्र, ही माहिती भरताना सर्व्हर सतत डाऊन असतो. त्यामुळे संकलित केलेली माहिती नेमण्यात आलेल्या सुपरवायजरला दिसत नाही.
सायंकाळी काम न करण्याचे आदेश
सायंकाळी सहानंतर शिक्षकांना काम न करण्याचे आदेश आहेत. मात्र, काही रोजंदारी करणारे कामगार आणि काम करणारे कर्मचारी हे सायंकाळनंतर भेटतात. त्यांची माहिती तेव्हाच मिळते. कारण सकाळी व दुपारच्या वेळी कामावर गेल्याने घरे बंद असतात.
जनगणनेचे काम करताना आत्तापर्यंत चार शिक्षकांचा जीव गेला आहे. एवढ्या उन्हात काम करण्यासाठी निकृष्ट दर्जाची टोपी दिली आहे. तर काहींना ती मिळालेली नाही. जनगणनेचे काम करणारे 45 ते 55 वयोगटातील प्रगणक आहेत. त्यांना मोठंमोठ्या इमारतींचा परिसर दिला आहे. लिफ्ट नसल्याने जिने चढ-उतार करून मोठी दमछाक होते. जनगणनेसाठी दिलेले साहित्यदेखील निकृष्ट दर्जाचे आहे.
एक शिक्षक
महापालिकेने कोणतीही वस्तू खरेदी केलेली नाही. जे काही साहित्य आले आहे ते जनगणना कार्यालयाकडून आलेले आहे.
सचिन पवार, उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी, महापालिका