

पिंपरी: शहराची गरज ओळखून पाण्याचे स्त्रोत वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. भामा-आसखेड धरणातून 167 एमएलडी आणि आंद्रा धरणातून थेट 100 एमएलडी असे एकूण 267 एमएलडी पाणी शहराला मिळणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापरावर भर देण्यात येणार आहे. तसेच, शहरातील पाणी वितरण व्यवस्थेचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. तर, 35 पैकी 25 टाक्या उभारण्यात आल्या आहेत. येत्या वर्ष, दीड वर्षात ती व्यवस्था सक्षम झाल्यानंतर शहराला दररोज पाणीपुरवठा करता येईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे.
शहरात पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. सव्वासहा वर्षांपासून शहराला दिवसाआड पाणी दिले जात आहे. दररोज पाणी कधी मिळेल, अशी विचारणा नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. त्यासंदर्भात आयुक्त बोलत होते. ते म्हणाले की, सध्या पवना धरणातून 550 एमएलडी, निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधाऱ्यातून 80 एमएलडी आणि एमआयडीसीकडून 30 एमएलडी पाणी घेण्यात येत आहेत.
भामा-आसखेड धरणातून 167 एमएलडी मिळणार आहे. ते काम अंतिम टप्प्यात आहे. तर, आंद्रा धरणातून थेट 100 एमएलडी पाणी आणण्यासाठी लवकरच काम सुरू करण्यात येईल, असे अतिरिक्त एकूण 267 एमएलडी पाणी शहराला मिळणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापरावर भर देण्यात येणार आहे.
तसेच, शहरातील पाणी वितरण व्यवस्थेचे काम 80 टक्के झाले आहे. तर, शहरभरात 35 पैकी 25 टाक्या उभारण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून शहरातील सर्व भागांत समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार आहे. येत्या वर्ष दीड वर्षांत ही सर्व व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर शहराला दररोज पाणी देता येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
नदी सुधार योजनेबाबत गैरसमज
पवना, मुळा व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मुळा नदी प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. इंद्रायणी नदी प्रकल्पास केंद्र व राज्य शासनाचा अमृत 0.2 मधून निधी मंजूर झाला आहे. पवना नदी प्रकल्प पीपीपी तत्त्वावर राबविण्याचा विचार सुरू आहे. त्याबदल्यात विकसकाला जागा उपलब्ध करून देण्याच्या पर्यायावर अभ्यास केला जात आहे. तसेच, इतर माध्यमातून निधी उभा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाणी नदीत मिसळले जाणार नाही. सांडपाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडले जाईल. नदीपात्रात अतिक्रमण रोखले जाईल. नदीचे पाणी स्वच्छ करण्यावर भर दिला जाणार आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.