

पिंपरी: भविष्यात एआय धर्तीवर राज्यातील उद्योगनगरांत काही योजना, लागू करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. कंपनीमध्ये प्रत्यक्ष उत्पादन करताना कर्मचारी, कामगारवर्ग हा पाहिजेच; मात्र उद्योगांतील तांत्रिकबाबींत एआयचा वापर करता येईल का, त्याचा रोजगारावर काय परिणाम होईल, याचा देखील अभ्यास करण्यात येईल. देशातील उद्योजगातमधील पहिले एआय धोरण पुढील तीन ते चार महिन्यांत राज्यातील उद्योगनगरांत आणणार आहोत, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
चिंचवड येथील एमआयडीसी कर्मचारी वसाहतीच्या उद्घाटनप्रसंगी शनिवार (दि. 21) मंत्री सामंत हे आले होते. त्यावेळी त्यांनी उद्योगविषयक व एमआयडीसीबाबत विविध मुद्यांवर माहिती दिली. एमआयडीसी अंतर्गत विविध प्रकल्प व कामे देखील प्रगतीपथावर असून ती कामे पूर्णत्वाकडे गेल्यानंतर वाहतूककोंडीची समस्या दूर होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, नदीसुधार योजनेचा आरखडा तयार केला असून, पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि एकत्रित अडीच हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे. केंद्रात काही मंजुरी बाकी असून, इंद्रायणी, पवना नदीसुधार प्रकल्पाला मूर्त स्वरुप येईल.
.. तो देशाचा अपमान
देशात सुरू असलेल्या एआय वर्ल्ड कॉन्फरन्सच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केलेल्या आंदोलनावर टीका केली. काँग्रेसच्या या आंदोलनाने केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नव्हे, तर देशाचा अपमान केला आहे. काँग्रेसला मतदारांनी आधीच नाकारले आहे, असा टोला मंत्री सामंत यांनी लगावला. लोकशाहीत विरोधी पक्ष आवश्यक आहे; मात्र जागतिक व्यासपीठावर कपडे काढून देशाची बदनामी करणारा विरोधी पक्ष किंवा नेता कशाला हवा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना राज्यभर आंदोलन करणार आहे. पुढील काळात काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडतील, असा दावाही त्यांनी केला.
संजय राऊत नेमके कोणत्या पक्षाचे
राज्यसभेच्या एका जागेवरुन महाविकास आघाडीत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. एका गटाने शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा केला तर, याच पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव पुढे आणले. त्यामुळे राऊत नेमक्या कोणत्या पक्षाचे आहेत, हे कळत नाही.
दोन वर्षात 265 घरे
एमआयडीसीच्या बिजलीनगर येथे गृहनिर्माण संस्थेचे उद्घाटन झाले. या ठिकाणी 24 महिन्यांत 265 घरे बांधण्यात आली. एका विभागाला जागा दिल्यानंतर त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतः च्या मालकीची वसाहत तयार करण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वी ही जमीन ताब्यात दिली.