

देहूगाव: देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य जलवाहिनीवर डल्ला मारत अनधिकृत नळजोड देण्याचा प्रकार देहूरोडमध्ये पुन्हा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अधिकृत नळजोड घेण्यासाठी नागरिकांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असताना, एजेंटच्या माध्यमातून रातोरात अनधिकृत नळजोड मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे 'अधिकृत नळजोड घेण्यासाठी गाढव मेल ओझ्याने,अन् शिंगुरु गेलं हेलपट्याने आणि अनधिकृत नळासाठी एजंटचे जाळे' आशा शब्दांत देहूरोडचे नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत.
स्थानिकांच्या माहितीनुसार, काही एजंट गरजू नागरिकांकडून मोठी रक्कम उकाळून बोर्डाच्या मुख्य जलवाहिनीवरून बेकायदेशीर जोडणी करून थेट घरापर्यंत पाइपलाइन टाकत आहेत. एक-एक इंचाच्या पाइपद्वारे पाण्याची चोरी सुरू असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, या जोडण्यांसाठी कोणतीही अधिकृत पाणीपट्टी आकारणी होत नसल्याने शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणात बुडत आहे.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, राजीव गांधीनगर, शिवाजीनगर आदी भागांत अशा प्रकारच्या अनधिकृत जोडण्या सुरू असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. अधिकृत नळजोड घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करताना, परवाने आणि विविध कागदपत्रांची पूर्तता करत असताना, नागरिकांची दमछाक होते. आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करूनही अनेकदा बोर्ड कार्यालयात वारंवार चकरा मारून देखील अधिकृत नळजोड मिळण्यास विलंब केला जात आहे. मात्र, एजंटच्या माध्यमातून पैसे मोजले की रातोरात नळजोडणी मिळते, असे उघडपणे देहूरोडमधील नागरिक बोलू लागले आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने संबंधित परिसरातील सर्व नळजोडण्यांची विशेष तपासणी करून अनधिकृतपणे दिलेल नळजोड तातडीने शोधून, दोषींवर कठोर कारवाई करावी. पाणीचोरीला संरक्षण देणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रशासनाकडून कारवाईचा केवळ फार्स
बोर्डाकडून अनधिकृत नळजोड घेणाऱ्यांविरुद्ध अधूनमधून कारवाई केली जाते. परंतु कारवाईनंतर पुन्हा त्याच ठिकाणी नळजोडण्या होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाच्या कारवाईचा केवळ दिखावा असल्याची चर्चा सध्या देहूरोडमध्ये सुरू आहे. त्यामुळे 'पाणीचोरीचा हा खेळ नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे ?' असाही सवाल देहूरोडचे नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती
मुख्य जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पाणीउपसा होत असल्याने त्याचा थेट परिणाम अधिकृत ग्राहकांच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. अनधिकृत नळ कनेक्शनमुळे पाणीपट्टी भरून पाणी घेणाऱ्या नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळत आहे. यामुळे अधिकृत नळ कनेक्शनधारकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येत आहे. प्रशासनाने अनधिकृत कनेक्शनवर कारवाई करणे गरजेचे
एजंटच्या 'नेटवर्क'ची चौकशी करा
नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना पाणी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते तर दुसरीकडे एजंटच्या माध्यमातून अनधिकृत नळजोड दिले जात असल्याची बाब गंभीर आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून अनधिकृत नळजोड देणारे एजंट, त्यांना सहकार्य करणारे अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित लाभार्थी यांची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.