

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : ratnagiri orange alert : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ चक्राकार वार्याची स्थिती आहे. या वार्याच्या प्रभावानेे कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे.
चक्राकार वार्याच्या प्रभावाने कोकण किनारपट्टी भागातील रत्नागिरी सह अन्य जिल्ह्यात गुरूवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. बुधवारी हलक्या पावसाने सकाळपासून सातत्य राखले असताना गुरूवारी पावसाच्या जोरदार शक्यतेने रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील अन्य जिल्ह्यात ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत आयएमडीने वर्तविले असून, त्याचा प्रभावही किनारी जिल्ह्यात होणार आहे. कमी दाबाचे क्षेत्र पूर्व किनारपट्टीकडे विस्तारीत होताना बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. हे संभाव्य चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे सरकणार नसले तरी त्याचा प्रभाव किनारी जिल्ह्याच्या वातावरणावर होण्याचे संकेत आयएमडीने संदेशाद्वारे दिले आहेत.
अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पर्यायाने कोकण किनारपट्टीवर प्रभाव राहणार आहे. त्यामुळे रत्नागिरीसह पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी पहाटेपासूनच हलक्या पावसाचे सातत्य होते.
अवकाळी पावसाने संकटात सापटलेल्या आंबा बागायतदारांच्या अडचणी त्यामुळे वाढल्या आहेत. बुधवारी सकाळपासूनच सातत्य राहिलेल्या हलक्या पावसाने वातावरणात गारवा येऊन तापमानातही कमालीचा बदल झाला. एरव्ही 30 अंश सेल्सिअस असणारे तापमान सकाळी 26 अंश सेल्सिअस होते.
दुपारी मात्र थोडी वाढ होऊन 28 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले. गुरुवारी किनारी भागात जोरदार पावसाची शक्यता असून, विजेच्या लखलखाटासह काही भागात मुसळधार पावसाची शक्यताही वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह अन्य किनारी जिल्ह्यात ऑरेंज अॅलर्ट जारी करताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.