

Who is Rishabh Shah: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी मुंबईत Gen Z आणि Gen Alpha या तरुण पिढीशी संवाद साधला. या कार्यक्रमात तरुणांकडून विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. या संवादाचे सूत्रसंचालन आणि आयोजन ऋषभ शाह यांनी केले. त्यानंतर ऋषभ शाह कोण? आणि IIMUN म्हणजे नेमके काय? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
ऋषभ शाह हा India's International Movement to Unite Nations (IIMUN) या युवा संस्थेचा संस्थापक आणि अध्यक्ष आहे. त्याने 2011 मध्ये या संस्थेची स्थापना केली. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, लोकशाही मूल्ये, मुत्सद्देगिरी, धोरणे आणि जागतिक घडामोडींविषयी जागरूकता निर्माण करणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.
आज IIMUN भारतासह अनेक देशांमध्ये कार्यरत असून, संस्थेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी आणि युवक विविध परिषदांमध्ये सहभागी झाले आहेत.
मुंबईतील ग्रीनलॉन्स हायस्कूल येथे ऋषभ शाहचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर त्याने एच.आर. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तसेच ट्रिनिटी कॉलेज, लंडन येथून स्पीच, ड्रामा आणि थिएटरचे शिक्षण घेतले.
ऋषभ शाह हा शिक्षणतज्ज्ञ, प्रेरणादायी वक्ता (Motivational Speaker), लेखक आणि सामाजिक उद्योजक म्हणूनही ओळखला जातो. विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये तो नेतृत्व, सार्वजनिक जीवन आणि धोरणनिर्मिती या विषयांवर मार्गदर्शन करत असतो.
IIMUN ही विद्यार्थ्यांसाठी Model United Nations (MUN) परिषदांचे आयोजन करणारी संस्था आहे. या परिषदांद्वारे विद्यार्थ्यांना जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचा आणि निर्णयप्रक्रियेचा अनुभव मिळतो. नेतृत्व विकास आणि संवाद कौशल्य वाढवण्यासाठी या उपक्रमाकडे महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून पाहिले जाते.
संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये देश-विदेशातील अनेक मान्यवर व्यक्तींनी सहभाग घेतला आहे. माजी राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, न्यायमूर्ती, उद्योगपती, चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांना IIMUN च्या मंचावर आमंत्रित करण्यात आले आहे.
ऋषभ शाहने Nothing But the Truth, An Open Mic आणि Young, Wired & Not Woke ही पुस्तके लिहिली आहेत. याशिवाय तो आपल्या कुटुंबाच्या आयर्न अँड स्टील व्यवसायाशीही संबंधित आहे. विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या सल्लागार मंडळांवरही तो कार्यरत असल्याचे सांगितले जाते.
मुंबईतील या कार्यक्रमात डॉ. मोहन भागवत यांनी तरुणांच्या प्रश्नांना थेट उत्तरे दिली. लोकशाहीत आंदोलन आणि विरोध हा संवादाचा मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र कोणत्याही आंदोलनाचा उद्देश समाजात फूट पाडणे नसून सर्वानुमते मार्ग काढणे हा असावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच Gen Z पिढीच्या अनेक तक्रारी आणि चिंता योग्य असल्याचे सांगत, त्यांच्या प्रामाणिकपणावर आपला विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.
या संवादाकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून Gen Z आणि Gen Alpha या नव्या पिढीशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. बदलत्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात तरुणांच्या प्रश्नांना समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद वाढवण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व वाढत असल्याचे मानले जात आहे.