नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज (दि.१७) नवीन संसद भवनाच्या 'गजद्वार' येथे राष्ट्रध्वज फडकाविला. या वेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि व्ही. मुरलीधरन यांच्यासोबत विविध पक्षाचे खासदार उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे हे कार्यक्रमात उपस्थित राहिले नाहीत.
साेमवार १८ सप्टेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशनास प्रारंभ होणार आहे. आधिवेशनाच्या एक दिवस आधी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला.
सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्यापैकी कोणीही कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत, अशी विचारणा माध्यमांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना केली. यावर ते संतापले. 'माझी येथे गरज नसेल तर मला सांगा, मी निघून जाईन', अशा शब्दांमध्ये त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शविली होती. त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण उशिरा मिळाले होते. खर्गे यांनी शनिवारी राज्यसभेचे सरचिटणीस पीसी मोदी यांना पत्र लिहून १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिराने कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्याचे नमूद केले होते. १६-१७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी हैदराबादमध्ये असून रविवारी रात्री उशिराने दिल्लीला परतणार असल्याचे त्यांनी म्हटले हाेते.
हेही वाचा :