

मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरमधील नवविवाहित दाम्पत्य राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी ( Sonam Raghuvanshi ) प्रकरणी आज (दि. ९ जून) झालेल्या खुलाशाने सर्वांनाच धक्का बसला आहे. राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पत्नी सोनम रघुवंशीसह अन्य तिघांना अटकही झाली आहे. हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित कट असल्याची प्राथमिक माहितीही पोलीस तपासात समोर येत आहे. जाणून घेवूया देशाला हादरवून सोडणार्या हत्या प्रकरणाविषयी...
राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम २२ मे रोजी हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. २३ मे रोजी संध्याकाळपासून ते चेरापुंजी जवळील ओसारा हिल्स येथून बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क झाला नाही.राजा रघुवंशी यांचा मृतदेह ११ दिवसांनंतर शिलाँगमधील एका पर्यटनस्थळी २०० फूट खोल दरीत झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ड्रोनच्या मदतीने त्यांचा मृतेदह शोधून काढण्यात आला. नवदाम्पत्यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची आणि सोनमचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कराची मदत घ्यावी, अशी मागणी केली होती.
मागील काही दिवस पोलीस हा सोनम रघुवंशीचा शोध घेत होते. ती उत्तर प्रदेशातील वाराणसी-गाझीपूर मुख्य रस्त्यावरील काशी ढाब्यावर सापडल्याने या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले. उत्तर प्रदेशचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ यश यांनी माध्यमांनासांगितले की, मूळची मध्य प्रदेशमधील इंदूर येथील रहिवासी असणारी सोनम रघुवंशी (वय२४) ही रविवारी रात्री वाराणसी गाझीपूर मुख्य रस्त्यावरील काशी ढाब्यावर सापडली. तिला प्राथमिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतले.
याचवेळी पोलिसांनी ललितपूरमधील महारौनी पोलिस स्टेशन परिसरातील आकाश कुमार या व्यक्तीलाही अटक केली आहे. मात्र सोनम ही गाझीपूरला कशी पोहचली? याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना मिळालेली नाही. ती रेल्वेने आली की बसनेयाची चौकशी सुरु आहे. आता सोनमला मेघालयला घेऊन जाण्यासाठी मेघालय आणि इंदूर पोलिसांचे पथक गाझीपूरमध्ये येण्याची अपेक्षा आहे.
गाझीपूरमधील काशी ढाबाच्या मालकाने पोलिसांना सांगितले की, मध्यरात्री एक वाजता एक तरुणी माझ्या ढाब्यावर रडत आली. तिने तिच्या भावाला फोन करण्यासाठी फोन मागितला. मात्र तिला ओळखत नसल्याने फोन दिला नाही. तिची अवस्था पाहून त्याने तत्काळ या घटनेची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना दिली. तत्काळ पोलीस ढाब्यावर आले. तिला ताब्यात घेवून पोलीस निघून गेले.
सोनमचे वडील देवी सिंह यांनी आपल्या मुलीवर लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. तसेच त्यांनी मेघालयच्या पोलिसांवर गंभीर आरोपही केला आहे. माध्यमांशी बोलताना देवी सिंह म्हणाले की, सोनम रघुवंशी हत्या प्रकरणी मेघालयचे मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. त्यांचीही सीबीआय चौकशी झाली पाहिजे. मला खात्री आहे की मुख्यमंत्रीही खोटे बोलत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लवकरात लवकर सीबीआय चौकशीसाठी पथक पाठवावे. मेघालय पोलिस खोटे बोलत आहेत. त्यांनी कोणतीही चौकशी केली नाही. राजा रघुवंशीच्या हत्येत मेघालय पोलिसांचा सहभाग आहे याची मला खात्री आहे. माझी मुलगी स्वतःहून गाजीपूरला कशी पोहोचली. तिला मेघालयात अटक करण्यात आली नाही, असेसवालही त्यांनी यावेळी उपस्थित केले.
सोनमचा पती राजा रघुवंशी यांच्या राजाचा भाऊ विपिन यानेही पोलिसांनच्या कारवाईवर सवाल उपस्थित केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. सर्व अफवा पसरवल्या जात आहेत. मेघालयाचे पोलीस महासंचालकांनी सोनमलाच खुनी ठरवले आहे; परंतु आतापर्यंत सोनमची योग्य चौकशीही झालेली नाही. तिला अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही, असेही त्याने स्पष्ट केले आहे.
२२ मे : राजा आणि सोमन हनिमूनसाठी मावलाखियात गावात पोहोचले. ३,००० पायऱ्यांचा चढ चढून नोंगरियातला गेले. येथे त्यांनी एका होमस्टेमध्ये रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही होमस्टेमधून बाहेर पडताना दिसले होते.
२३ मे : दोघांचाही कुटुंबाशी संपर्क तुटला. यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, होमस्टेमधून बाहेर पडल्यानंतर दोघेही मावलाखैत गावात गेले. दोघांचे मोबाईल फोनचे शेवटचे लोकेशन मावलाखैतमध्ये सापडले . त्याच दिवशी, शिलाँग-सोहरा रस्त्यालगत एका कॅफेजवळ त्यांची भाड्याने घेतलेली स्कूटर बेवारस अवस्थेत आढळली हेती. ग्रामस्थांनी ही बाब पोलिसांना कळवली, त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांनी भेट दिलेल्या परिसराचे मॅपिंग केले.
२७ मे : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बेपत्ता नवदाम्पत्याचा शोध घेण्यासाठी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्याशी संपर्क साधला. संगमा यांनी यादव यांना आश्वासन दिले की, मेघालय पोलिस आणि प्रशासन त्यांचा शोध घेण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत.
२ जून : राजा रघुवंशीचा मृतदेह मेघालयात सापडला. यानंतर पत्नी सोनमचा शोध सुरूच होता. घटनास्थळावरून रक्ताने माखलेला चाकू आणि सोनम स्कूटरमध्ये ठेवताना दिसलेला रेनकोट देखील जप्त करण्यात आला.
४ जून : राजा रघुवंशी यांचा खून झालेल्या ठिकाणाहून महिलेचा पांढरा शर्ट, औषधाची पट्टी, मोबाईल फोनच्या एलसीडी स्क्रीनचा एक भाग आणि एक स्मार्टवॉच जप्त करण्यात आले. याच दिवशी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
०६ जून : सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजा आणि सोनम २३ मे रोजी सोहराच्या सैतसोहपेन येथील मनहा हॉटेलमध्ये एक लहान सुटकेस घेऊन स्कूटरवरून पोहोचल्याचे दिसून आले. खोली मिळवण्यात अयशस्वी झाल्यानंतर, ते हॉटेलमध्ये सुटकेस सोडून परिसरातून निघून गेल्याचे स्पष्ट झाले होते.
०९ जून : मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी एक्स पोस्ट करत माहिती दिली की, राजा रघुवंशी हत्या प्रकरणी सोनम रघुवंशीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. महिलेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. नंतर, मेघालयचे डीजीपी आय नोंगरांग यांनी सांगितले की सोनमला उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये अटक करण्यात आली आहे.