

Share Market Update :
गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात म्हणावा तसा उत्साह नव्हता. जीएसटी रेट कट नंतरही मार्केट थंड प्रतिक्रियाच देत होतं. आज बुधवारी (दि १ ऑक्टोबर) सकाळी देखील शेअर बाजारात संथताच होती. मात्र आरबीआयच्या MPC बैठकीचे निष्कर्षांची घोषणा केल्यानंतर शेअर बाजारात अचानक चैतन्य संचारलं. सेन्सेक्स आणि निफ्टी वेगानं वर जात होते.
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी एमपीसी बैठकीतील निष्कर्षांचा घोषणा केली तसं सेन्सेक्स हा ६८० अंकांनी उसळला. तर निफ्टी देखील २०० अंकांनी वधारला. विशेष म्हणजे आरबीआयनं रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र आरबीआयनं भारतीय अर्थव्यवस्थेबाबत, महागाईबबात आणि भारतीय चलन रूपयाबाबत अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा परिणाम थेट शेअर मार्केटवर झाला आहे.
आज शेअर बाजाराची सुरूवात झाली त्यावेळी बीएसई रेड झोनमध्ये होता. मात्र हळू हळू तो ग्रीन झाला. मात्र मार्केटचा स्पीड हा संथच होता. मात्र गव्हर्नर यांची प्रेस झाली. त्यात त्यांनी भारताच्या जीडीपी वाढाचा अंदाज वाढणार आणि महागाई दर कमी होण्याचा अंदाज वर्तवला. त्यानंतर शेअर मार्केटमधील सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीकडे मोठी उसळी दिसली. सेन्सेक्स ६८० अंकांनी वाढून ८० हजार ९४८ अंकांवर पोहचला.
दुसरीकडं नॅशनल स्टॉक्स इंडेक्समध्ये देखील मोठी उसळी पहायला मिळाली. तो २०० अंकांनी उसळून २४ हजार ८०० च्या पार गेला.
रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रेपो रेट ५.५% वर स्थिर ठेवण्यात आला असला तरी, FY26 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज ६.५% वरून थेट ६.८% पर्यंत वाढवण्यात आल्यामुळे बाजारात मोठी तेजी दिसून आली. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, GST सुधारणा, वाढती देशांतर्गत मागणी, सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि स्थिर आर्थिक वातावरण यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त, RBI ने किरकोळ महागाई (Retail Inflation) ३.१% वरून २.६% पर्यंत खाली येण्याचा अंदाज वर्तवून एक चांगली बातमी दिली आहे. दुसऱ्या तिमाहीत हा दर २.१% वरून १.८% तर चौथ्या तिमाहीत ४.४% वरून ४% राहण्याची शक्यता असून, GST सुधारणांना या सकारात्मक बदलाचे कारण मानले गेले आहे.